एकाच पदासाठी प्रसाद रेशमे, ओम प्रकाश बकोरियांची नेमणूक
औरंगाबाद - महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या संचालकपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्यात कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. गेल्या महिन्यात या पदावर सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांची मुख्यमंत्र्यांनी बदली केली होती. केंद्रेकरांनी पदभार घेण्याआधीच त्यांची राज्याच्या कृषिआयुक्तपदी वर्णी लावण्यात आली; तर संचालकपदावर ऊर्जामंत्र्यांनी आपल्या मर्जीतील नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांची औरंगाबादला बदली केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ओम प्रकाश बकोरिया यांची आता महावितरणच्या सह-व्यवस्थापकीय संचालकपदावर केली आहे. पद एक; मात्र त्यावर दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्यामुळे "कुरघोडी'ची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे.
महावितरणच्या मराठवाड्यातील आठ आणि खानदेशातील तीन, अशा 11 जिल्ह्यांच्या वीज वितरण प्रणालीत सुधारणा करणे, वसुली वाढविणे व वीजगळती कमी करण्यासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये प्रादेशिक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. मराठवाडा आणि विदर्भ आणि खांदेश या भागांत मोठ्या प्रमाणावर वीजगळती, वीजचोरी आणि थकबाकी आहे. थकबाकी वसूल करणे, महावितरणच्या सुविधा- सेवा सुधारणे, परिमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी ही कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. 22 एप्रिलला राज्यातील 31 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सुनील केंद्रेकर यांची महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या सह-व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली; मात्र त्यांनी पदभार घेण्यापूर्वीच पुणे येथील राज्याच्या कृषिआयुक्तपदी बदली करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी सुनील केंद्रेकरांची केलेली नियुक्ती ऊर्जामंत्र्यांना चांगलीच खटकली होती. यामुळे ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यात खडकेही उडाले. दरम्यान ऊर्जामंत्र्यांनी शुक्रवारी (ता. 12) नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रसाद रेशमे यांची बदली औरंगाबादच्या प्रादेशिक कार्यालयात केली. रेशमे यांच्या जागी भालचंद्र खंदाईत यांनी मंगळवारी (ता. 16) नागपूर संचालकपदाचा पदभार स्वीकारला. रेशमे हे याच आठवड्यात पदभार स्वीकारणार होते; मात्र त्यातच गुरुवारी (ता. 18) ओम प्रकाश बकोरिया यांची याच पदावर बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचा पदभार ऊर्जामंत्र्यांचा अधिकारी स्वीकारणार की मुख्यमंत्र्यांचा, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.
|