चिकलठाणा विमानतळावरून अवघ्या अडीच विमानांची सेवा!

Aeroplane
Aeroplane

औरंगाबाद - मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विमानसेवेवर परिणाम झाला आहे. त्यातच औरंगाबाद-मुंबई जेट एअरलाइन्सच्या सेवेवर ऑपरेशनल कारणाने परिणाम झाला. एकूणच परिस्थितीने चिकलठाणा विमानतळावरून दोन मोठे अन्‌ एक छोटे अशी अवघी अडीच विमाने सुरू आहेत. 

मराठवाड्याची आणि पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादसाठी सक्षम विमानसेवा सुरूच होत नाही. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे दिल्ली, मुंबई आणि ट्रुजेटचे हैदराबाद ही विमाने उड्डाण करीत आहेत. जेट एअरवेजची मुंबई विमानसेवा सक्षमपणे चालवली जात होती; मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जेटच्या विमानसेवेवर अंतर्गत कारणांनी परिणाम झाला आहे. त्यातच मुंबई विमानतळावरील धावपट्टीची दुरुस्ती सुरू असल्याने अनेक विमान कंपन्यांच्या विमानसेवेवर परिणाम झाला आहे. त्यात औरंगाबाद-मुंबई या जेट एअरवेज विमानाचा समावेश आहे. जेटने सायंकाळची मुंबई सेवा बंद केली. सकाळी सुरू असलेली सेवाही बंद केली होती; मात्र ही सेवा ३१ मार्चपासून पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. एकूणच विमानसेवा बंद झाल्याचा फटका उद्योजक, देशी-विदेशी पर्यटकांना बसला. जेटच्या विमानाचा ताण एअर इंडियाच्या विमानावर आल्याने, ते विमान पूर्णपणे पॅक जात आहे. औरंगाबाद विमानतळावरून पुरेसा प्रवासीवर्ग उपलब्ध असतानाही विमान कंपन्या नवीन विमान सेवा सुरू करीत नाहीत. शहरातून चेन्नई, बंगलोर, तिरुपती, अहमदाबाद, जयपूर, नागपूर, पुणे या मार्गावरील विमानसेवा सुरू करण्याची मागणी औद्योगिक संघटनांनी केलेली आहे.

चेन्नई आणि बंगलोर येथे ऑटोमोबाईल कंपन्या असल्याने या कंपन्यांना वाळूज औद्योगिक वसाहतीतील व्हेंडरकडून जवळपास ७० टक्के लहान-मोठे सुटे भाग पुरविले जातात. या उद्योजकांना चेन्नई किंवा बंगलोरला जावयाचे असल्यास त्यांना पुणे किंवा मुंबईहून जावे लागते. चिकलठाणा विमानतळावरून चेन्नई, बंगलोर या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू केली तर फायदेशीर ठरू शकते; मात्र विमान कंपन्या त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

सद्यःस्थिती अशी 
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या एअर इंडियाचे मुंबई-दिल्ली १२० आसन क्षमतेचे दोन मोठे आणि एक ट्रुजेटचे ६५ आसनांचे छोटे विमान हैदराबादची सेवा देत आहे. अशी एकूण अडीच विमाने सध्या या विमानतळावर रोज सायंकाळी येत आहेत.

जयपूर सेवा बंदच 
एअर इंडियाची पूर्वी जयपूर विमानसेवा सुरू होती. ही विमानसेवा प्रवासी मिळत नसल्याचे कारण देऊन बंद करण्यात आली. तब्बल नऊ वर्षांपासून ही विमानसेवा बंद आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही विमानसेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी केली जात असल्याची माहिती टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com