स्वच्छता अभियानाच्या लाचखोर पथकाचा

स्वच्छता अभियानाच्या लाचखोर पथकाचा

औरंगाबाद - स्वच्छ भारत नागरी अभियान या केंद्र सरकारच्या अतिशय चांगल्या उपक्रमाला गालबोट लावण्याचे काम करणाऱ्या लाचखोर सर्वेक्षण पथकाच्या कारनाम्याचा अहवाल घेऊन महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया सोमवारी (ता.23) मुंबईला गेले. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे ते अहवाल सादर करणार आहेत तसेच केंद्र सरकारकडेदेखील हा अहवाल दिला जाणार आहे. दोन हजार गुणांच्या या स्पर्धेत या पथकाच्या हातात असलेल्या 500 गुणांपैकी गुणदान करण्यासाठी या पथकाच्या तोंडाला पहिल्या दिवसापासूनच पाणी सुटले होते. पहिल्या दिवशीच त्यांना ऍन्टीकरप्शनच्या ताब्यात देण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार होता. आलेल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अशा दोनच दिवसांत या पथकाने महापालिकेच्या पर्यायाने जनतेच्या पैशाने 31 हजारांची महागडी दारू ढोसल्याचे समोर आले.

स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी (ता.19) शहरात आले होते. क्‍वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या या पथकात पथकप्रमुख शैलेश बंजानिया व विजय जोशी आणि गोविंद गिरामे यांचा समावेश होता.

दोन हजार गुणांच्या स्पर्धेतील स्वच्छतेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारपासून (ता. 20) केंद्रीय पथकाने शहरात सुरवात केली होती. या पथकाच्या प्रमुखाला एक लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी (ता.21) येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ः गुरुवारी (ता.19) नऊ हजार रुपयांची त्यांनी दारू घेतली तर दुसऱ्या दिवशी 22 हजारांची दारू घेतली. हॉटेलमधील संबंधित खोली त्यांच्याच नावावर असून महापालिका फक्‍त त्यांना सर्वेक्षणासाठी मदत करत होती. केवळ आदरातिथ्याचा भाग म्हणून त्यांच्यासाठी प्रशासनाने 50 हजार रुपयांची तरतूद केली होती. ज्यावेळी हे मद्यपान सुरू होते त्यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि ही बाब आयुक्‍तांच्या कानावर घातली. त्यावेळी त्यांनी खाण्यापिण्याच्या बाबतीत एवढी बारकाई नको, असे सांगून नाइलाजाने त्यालाही मान्यता दिली.

पहिल्या दिवशी या अभियानाच्या महापालिकेतील समन्वयक डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्याकडे बसून 900 गुणांच्या दस्तऐवजांची तपासणी करत असतानाच बंजानिया सतत फिल्डवर असलेल्या अन्य दोघांशी संवाद साधत होते आणि तुमचे निगेटिव्ह मार्किंग येत आहे असे वारंवार सांगून पैशाची मागणी करण्यासाठी अप्रत्यक्षपणे पार्श्‍वभूमी तयार करत होते. महापालिका प्रशासनाला 900 व 600 गुणांपैकी चांगले गुण मिळतील याची खात्री होती तर प्रत्यक्ष पाहणीचे 500 गुण देणे या पथकाच्या हातात होते. या 500 गुणांसाठीच बंजानिया यांनी पैशाची मागणी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com