60 वर्षात झालेले खड्डे एकदम बुजवता येत नसतात- फडणवीस

60 वर्षात झालेले खड्डे एकदम बुजवता येत नसतात- फडणवीस

जालना- 60 वर्षात झालेले खड्डे एकदम बुजवता येत नसतात. काँग्रेसने 60 वर्षात केलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरवात तर झाली ही चांगली गोष्ट असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुढे फडणवीस म्हणाले की, मोदी हटाव हेच विरोधकांचे लक्ष आहे. जालन्यातील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. विरोधकांना आपलं अस्तित्व संपण्याची भीती आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

कीतीही महागठबंधन केले तरी मोदींचा विजय निश्चीत असल्याचे फडणवीसांनी सांगितले. पुढची कार्याकारिणी बैठक ही लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतरच होईल. देशात गरिबांच्या नावाने राजकारण केलं जात आहे. भाजप हा जनतेचा पक्ष आहे. गोर-गरिबांचा पक्ष आहे. म्हणूनच राज्यातील जनता ही भाजपच्या मागे उभी आहे, आणि पालिकेच्या निवडणुकीत ते स्पष्ट दिसून आले आहे.

विरोधकांकडे निती, नियम आणि धोरण नाही. आगामी निवडणुक ही एका पर्वाची निवडणुक असेल. देशात गरिबांच्या नावाने राजकारण करण्याचे काम विरोधक करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. आमच्या सरकारच्या काळात 1600 कोटींचा विमा शेतकऱ्यांना दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

21 वं शतक हे भारताचं शतक असेल हे स्वामी विवेकानंद म्हटले होते. पुढील पाच वर्षात मोदींच्या नेतृत्त्वाखाली आपण स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत साकारू शकतो असाही विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 2014 ला आपण इतिहास घडवला, त्याचे आपण साक्षीदार होतो. आता 2019 च्या निवडणुकाही आपल्याला अशाच ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार व्हायचे आहे. ही निवडणूक 2014 च्या परिवर्तानवर शिक्कामोर्तब करणारी निवडणूक ठरणार आहे. विरोधकांपुढे देशाचा विकास हे ध्येय नाही. भारतात सामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन व्हावं अशी विरोधकांची मुळीच इच्छा नाही असंही मुख्यमंत्री म्हटले आहेत.

निवडणुकांच्याआधी तुम्ही नेता ठरवू शकत नाही. सत्ता आली तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी सगळेच एकत्र येतील मात्र हे विरोधकांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. हे सगळे त्यांच्या राज्याचे नेते आहेत. त्यांनी कितीही विरोध दर्शवला, मोदी हटाव ही मोहीम कितीही राबवली तरीही ती यशस्वी होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com