शहरात घडू शकते मुंबईची पुनरावृत्ती! 

शहरात घडू शकते मुंबईची पुनरावृत्ती! 

औरंगाबाद - धोकादायक इमारती कोसळून मुंबईत अनेकांचे बळी जात असताना औरंगाबाद महापालिकादेखील बळींची वाट पाहत आहे का, असाच प्रश्‍न उभा राहिलेला आहे. शहरात 61 मालमत्ता धोकादायक जाहीर करून त्यांना केवळ नोटिसा बजावण्यात आल्या. वॉर्ड अभियंत्यामार्फत या इमारतींची पडताळणी केल्यानंतरच कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्यामुळे आगामी काळात मुंबईतील पुनरावृत्ती घडण्याची भीती व्यक्त होत आहे. 

मुंबईतील पावसाच्या बळींचा आकडा वाढतच आहे. मालाड येथे जलाशयाची भिंत कोसळून तीस जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी (ता.16) डोंगरी येथे धोकादायक इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. त्यातून धडा घेण्याऐवजी औरंगाबाद महापालिका मात्र शहरातील धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष करत आहे. 

जुन्या शहरात अनेक धोकादायक इमारती आहेत. त्यातील अनेक ठिकाणी नागरिक वास्तव्यास आहेत. तर काही ठिकाणी इमारती रिकाम्या असल्या तरी त्या इतर घरांवर कोसळून जीवित हानी होण्याची शक्‍यता आहे. महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचा आढावा घेऊन त्या पाडून घेण्यासंदर्भात इमारत मालकांना नोटीस बजावते. यंदाही महापालिकेने मे महिन्यात 62 धोकादायक इमारतींना नोटीस बजावल्या होत्या. यातील एक इमारत गेल्या महिन्यात कोसळली. उर्वरित भाग महापालिकेने पाडून टाकला. उर्वरित इमारतींवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. महापालिकेने इमारत मालकांना आठ दिवसांची मुदत दिली होती. या मुदतीत इमारत पाडून न घेतल्यास ती इमारत महापालिका पाडेल आणि त्याचा खर्च मालकाकडून वसूल केला जाईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला होता. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. 

मालक-भाडेकरूमध्ये वाद 
अनेक इमारतींमध्ये मूळ मालक व भाडेकरूमध्ये वाद आहे. त्यामुळे वादग्रस्त इमारती धोकादायक ठरवून त्या पाडण्यासाठी मालक आग्रही असतो, तर धोकादायक असूनही इमारतीचा ताबा सोडण्यास भाडेकरू तयार नसतो. त्यामुळे देखील कारवाई करताना महापालिकेची अडचण होत आहे. 

""मोडकळीस आलेल्या इमारतींना महापालिकेने नोटीस बजावल्या होत्या. वॉर्ड अभियंत्यामार्फत या इमारतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. इमारत खरेच धोकादायक आहे का? याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल.'' 
-रवींद्र निकम, उपायुक्‍त, महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com