लोकशाही "कुटुंबशाही' झाली - ऍड. प्रकाश आंबेडकर 

लोकशाही "कुटुंबशाही' झाली - ऍड. प्रकाश आंबेडकर 

परभणी - लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांकडे सत्ता गेली पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांनी जातीऐवजी कार्यकर्ते, लोकांना महत्त्व दिले पाहिजे. परंतु पक्षांनी पहिल्यांदा जातीत, नंतर कुटुंबात सत्ता केंद्रित केली. मागील सत्तर वर्षांत लोकशाही ही कुटुंबशाही झाली, याचे भानही राहिले नाही, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

वंचित बहुजन आघाडीतर्फे परभणीतील जामकर विद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (ता. 16) सत्तासंपादन मेळावा झाला. त्यात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते मारोतराव पिसाळ अध्यक्षस्थानी होते. ऍड. अण्णाराव पाटील, माजी आमदार तथा पद्मश्री लक्ष्मण माने, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष इम्तियाज खान, नांदेडचे फिरोज लाला, आघाडीचे निमंत्रक डॉ. धर्मराज चव्हाण, नगरसेवक अमित भुईगळ, शिवानंद हैबतपुरे, किशन चव्हाण, पी. एल. भारती, कॉ. गणपत भिसे आदी उपस्थित होते. 

ऍड. आंबेडकर म्हणाले, "राज्यातील 169 कुटुंबांत सत्ता केंद्रित असून ती अबाधित ठेवण्यासाठी गरीब, वंचितांना विवंचनेत ठेवले जाते. कारण दैनंदिन जीवनात त्यांना विचार करण्यासही वेळ मिळणार नाही. आता वंचित आघाडी पाहून कॉंग्रेस पक्ष चार जागा देण्यास तयार झाला. पण आम्ही सालगडी राहिलो नाहीत, वंचित आघाडीच कॉंग्रेसला चार जागा देणार आहे, त्या मुकाट्याने घ्या; अन्यथा फजिती करून घ्या. तत्पूर्वी "एमआयएम'ला सोडा, वंचितांना कॉंग्रेस आघाडीत स्थान देऊ, असे कॉंग्रेसने सांगितले. परंतु केरळ राज्यात कॉंग्रेसला मुस्लिम लीग चालते, मग राज्यात का चालत नाही? अर्थात कॉंग्रेसला मुस्लिम पाहिजेत; परंतु मुस्लिम नेते नको आहेत. त्याचा विचारही कॉंग्रेसमधील मुस्लिम परिवारांनी करावा.' 

जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेला दहशतवादी हल्ला हे सरकाचे अपयश आहे. दहशतवादी हल्ला होणार, हे गुप्तचर विभागाने सांगितल्यानंतर त्याची बातमी दडविली. ती योग्य माणसापर्यंत पोचविली नाही. बातमी दाबणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा सरकारकडून आणि तथाकथित देशभक्त म्हणविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बाळगतो, अशी उपरोधिक टीका ऍड. आंबेडकर यांनी केली. 

भाजपाला मत म्हणजे कैद्यांना मत आहे. परंतु खुल्या आकाशाखाली जगायचे असेल, तर वंचित आघाडीला मत द्या, असे आवाहन ऍड. आंबेडकरांनी केले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. श्री. पिसाळ यांनी अध्यक्षीय समारोप केला. भारिप जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित यांनी प्रास्ताविक केले. उषा उबाळे हिने सूत्रसंचालन केले. 

पाच उमेदवार जाहीर 
भाषणाच्या प्रारंभी ऍड. आंबेडकरांनी लोकसभेसाठी पाच उमेदवार जाहीर केले. त्यात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील (औरंगाबाद), विष्णू जाधव (बीड), प्रा. यशपाल भिंगे (नांदेड), अर्जुन सलगर (उस्मानाबाद), शरदचंद्र वानखेडे (जालना) यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com