'दबक्या पावलाने हुकूमशाही येतेय'

marathwada
marathwada

कवी अटलबिहारी संमेलननगरी, (उदगीर) : आपल्या आजूबाजूचे सामाजिक सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण चिंतीत करणारे आहे. विचारवंतांचे होणारे खून, कपड्यावर- खाण्यावर घातले जाणारे निर्बंध, जात धर्माच्या नावावरून पसरवला जाणारा तेढ ही लोकशाही नसून दबक्या पावलांनी येणारी हुकूमशाही आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी चिंता व्यक्त केली. हुकूमशाहीचे रुप पुतना मावशीसारखी असते. तीआकर्षक वाटते पण विष ओकते, असेही ते म्हणाले.

मराठवाडा साहित्य परिषद आणि परिषदेच्या उदगीर शाखेच्या वतीने आयोजित 40व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. शिवाय, मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या सुंबरान या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात समाज व्यवस्था, राज्यकर्ते, लेखक यांना उद्देशून आपले परखड विचार मांडले. या वेळी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रंगनाथ तिवारी, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माहिती आयुक्त दिलीप धारुरकर, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके, शिक्षक आमदार विक्रम काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कांबळे म्हणाले, आपल्या आजूबाजूला भय नाही असे वारंवार सांगितले जात आहे. मग इतके भय कंपित वातावरण का घोंगावत आहे, देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्यासारखे का वाटत आहे, अनेक समाजसमूहाला असुरक्षित का वाटत आहे, याचा नीट विचार झाला पाहिजे. माणूस संपविण्याचे कटकारस्थान चालू आहे. माणसं सज्ञान होऊ नयेत, ती अंधश्रद्धेच्या कोंडवाड्यात राहावीत याचे प्रयत्न सुरु आहेत. व्यक्ती स्वातंत्र्याची मोठ्या प्रमाणात गळचेपी सुरु आहे. हे प्रकारे धर्मांधतेच्या तीक्ष्ण भाल्याने केले जात असतील तर धर्माचाही पुनर्विचार करायला हवा.

अतोनात प्रयत्न हवेत
प्रत्येक घरात गीता असायला हवी, असे आरएसएस सांगते, पण नुसती गीता घरात असून उपयोग नाही. त्याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा, असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, साहित्य हे नुसते मनोरंजन करणारे असू नये. जे साहित्य विचार करायला लावते, तेच टिकते. जगण्याचा अर्थ शोधणे हे साहित्याचे काम आहे. सभ्यतेचा ऱ्हास होऊ नये म्हणून साहित्यिक, कलावंतांनी अतोनात प्रयत्न करायला हवेत.
- विवेक सौताडेकर, अनिता येलमटे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com