औरंगाबाद : "गुरुदेव बायोटेक'च्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या संचालक मंडळातील एकाला उस्मानपुरा पोलिसांनी बुधवारी (ता. 15) मयूरपार्क येथून अटक केली.
शहरात 2012 ला गुरुदेव बायोटेक नावाचे कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस सुरू झाले होते. या कंपनीचे संचालक राजन बालिघाटे-जोशी, अभय सातवे, अशोक कुलकर्णी (पुणे), सुरेंद्र गोठणकर, संजय मालुंजेकर, अशोक कुलकर्णी (रा. औरंगाबाद) यांनी शेकडो लोकांना फसविले होते.
शहरातील एका ऍडव्हर्टायझर्समार्फत महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक, आसाम, गुजरात अशा विविध ठिकाणी जाहिराती केल्या. त्यानंतर एजन्सीचे साडेचार लाख दिलेच नव्हते. नागपूर येथील एका व्यक्तीसोबत कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स पुरविण्यासाठी विदर्भाचे वितरक म्हणून नेमणुकीसाठी करार केला व दहा लाख रुपये हडपल्याचा आरोप होता. विभागस्तरावर; तसेच जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर वितरक नेमण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांचे लाखो रुपये हडपण्यात आले. महाराष्ट्रासह विविध राज्यांत जाहिराती छापून जाहिरात एजन्सीची लाखो रुपयांची रक्कम बुडविली. जेथे इमारती भाड्याने घेतल्या त्या मालकांनाही भाडे दिले नाही. कंपनीच्या कामासाठी भाड्याने घेतलेली वाहने, कार्यालयात काम करणारे कर्मचारी यांचेही पैसे देण्यात आले नव्हते. अस्खलित इंग्रजी, मराठी, हिंदी बोलणाऱ्या या भामट्यांच्या भूलथापांना अनेकजण बळी पडले होते. कंपनीतर्फे सेमिनार, कार्यशाळा घेऊन त्यांनी आमिष दाखवीत विश्वास संपादन केला होता.
या प्रकरणात 26 जुलै रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात, तर 27 ऑगस्ट 2012 रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. यातील उस्मानपुरा प्रकरणातील गुन्ह्यांत सुरेंद्र गोठणकरविरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढले होते. त्यानुसार, मयूरपार्क येथून गोठणकरला अटक केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश टाक यांनी दिली.
|