उष्माघाताच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात कक्ष

उष्माघाताच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात कक्ष

बीड - सध्या जिल्ह्यातील कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे जात आहेत. यामुळे जिल्ह्यात गरमीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जिल्ह्यातील उष्णतेच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयाच्या वतीने विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. यासह जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष एक कक्ष तयार करण्यात आला आहे. यासह जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांत उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस पडलेला आहे. यामुळे एक तर पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे. त्यात यंदा मेमध्ये जाणवणारी उष्णता मार्च-एप्रिल मध्ये जाणवू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या शरीराची लाही लाही होताना दिसत आहे. उष्मघाताने मृत्यू होण्याची शक्‍यता असते. यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या उष्मघाताच्या रुग्णांसाठी एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्‍टरांची एक टीम तैनात केली आहे. एखादा उष्मघाताचा रुग्ण आला तर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करण्याच्या अनुषंगाने हा कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली. 

उष्माघाताच्या रुग्णांसाठी ही खबरदारी घ्यावी
उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवावे. शरीराचे तापमान खाली आणण्याचा प्रयत्न करावा, ओल्या कपड्याने अंग पुसावे, थंड पाणी डोक्‍यावर टाकावे किंवा ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरु करावे, उष्माघात घातक ठरू शकतो. यामुळे अशा रुग्णांसाठी सर्वांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

सध्या जिल्ह्यातील कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. याअनुषंगाने उष्मघाताच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात एक कक्ष तयार करण्यात आलेला आहे. यासह जिल्हाभरात आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे; तसेच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्‍यतो बाहेर पडू नये, यासह गरोदर माता, वयोवृद्ध नागरिक व लहान बाळांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यासह लिंबू-पाणी व इतर थंड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करावे. 
-डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

..अशी घ्यावी काळजी 
जिल्ह्यातील नागरिकांनी अतिउष्ण वातावरणात काम करू नये, पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे, हलक्‍या रंगाच्या सुती कपडे वापरावेत, घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा, मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचे टाळावे, शिळे अन्न खाऊ नये, उन्हात काम करत असताना चेहरा व डोक्‍याला ओल्या कपड्याने झाकावे, चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्‍टरकडे जावे, ओआरएस व लस्सी, ताक, लिंबू पाणी इत्यादी घरगुती शीतपेयांचे भरपूर सेवन करावे, कडक उन्हामध्ये बाहेरील शारीरिक कामे करू नये. गडद व घट्ट कपडे घालू नये. यासह पाळीव प्राण्यांचीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com