पर्यावरणवेड्या डॉक्टरची जलसंधारणासाठी तळमळ

kendrekar
kendrekar

परभणी : जगात ध्येयवेड्या व्यक्तींची कमतरता नाही. परंतु एक सामाजिक बांधीलकी म्हणून पर्यावरण रक्षणासाठी झटणारे मात्र फार कमी दिसून येतात. वैद्यकीय पेशात असतांना सुध्दा निसर्गाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न येथील डॉ. रविंद्र केंद्रेकर करीत असून जलसंधारणाबरोबरच तुटलेली जैविक अन्नसाखळी पुन्हा जीवंत करण्यासाठी झटत आहेत. 

शहरातील नागरीक गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. पावसाचे घटलेले प्रमाण व अनियमित पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जात असून पडलेले पावसाचे पाणी सिमेंटच्या जंगलातून वाहून जात आहे. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीपासून शहराच्या अनेक भागातील पाणी पातळी खोल जाते व विंधनविहीरी, हातपंप कोरडे होतात. तेव्हा जलसंधारण, जल पुनर्रभरणाचे प्रश्न चर्चेला येतात. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी विविध संस्था जनजागृती करतात, तांत्रिकी प्रशिक्षण, सुविधाही उपलब्ध करून देतात. परंतु परिणामकारक असे काहीही घडून येत नाही व पावसाळा लागला की, उन्हाळ्यात तोंड दिलेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नाचा विसर पडतो. 

डॉ. केंद्रेकर यांच्या जिद्दीची कहाणी
येथील डॉ. रविंद्र केंद्रेकर हे आपल्या पेशा सांभाळून व सामाजिक बांधीलकी जोपासून समाजासाठी, पर्यावरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहे. आले तर सोबतीने नाही आले तर स्वतः पुढाकार घेऊन ते विविध क्षेत्रात बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

संत ज्ञानेश्वर माऊली शाश्वत विकास प्रतिष्ठाणच्या माध्यमातून त्यांनी गेल्या काही महिण्यापासून शहराच्या विविध भागात जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. शहरातील फिरून मोकळ्या जागांची पाहणी करून, तेथील नागरीकांना सोबत घेऊन व महापालिकेच्या परवानगीने ते ही कामे स्वखर्चातून करीत आहेत. 

तीन ठिकाणी खोदले तलाव...
शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीजवळ मोकळ्या जागेच्या उतारावर त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने 100 बा 100 फुट आकाराचा व आठ ते दहा फुट खोल खड्डा  खोदला असून परिसरात पावसाचे पडलेले पाणी या खड्ड्यात येईल अशी व्यवस्था केली आहे. वसमत रस्त्यावरील यलदरकर कॉलणी येथील मैदानावर 60 बाय 60 फुट आकाराचा खड्डा तयार करण्यात आला असून वकील कॉलणी येथील पाडेला फंक्शनल हॉल समोर देखील असाच 30 बाय 30 आकाराचा खड्डा खोदला आहे. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून येते, अशाच जागांची त्यासाठी डॉ. केंद्रेकर यांनी निवड केली आहे. शहरात अन्य काही ठिकाणी तलाव खोदण्याचा त्यांचा मानस आहेच. त्याचबरोबर इटोली सारख्या जंगल क्षेत्रात जलसंधारणाबरोबरच वृक्षारोपनाचे काम देखील त्यांनी सुरु केले आहे. 

जलसंधारणाचा दुहेरी उद्देश...
डॉ. केंद्रेकर यांनी जलसंधारणाची कामे हाती घेतांना सर्व प्राणी मात्रांचा विचार केला आहे. भूपृष्ठावर खोदून तेथे तलावाची निर्मिती केल्यास पावसाच्या पाणी जमिनीत मुरण्यास वॉटर टेबल वाढण्यास तर मदतच होणार आहे. परंतु त्या तलावात, आजूबाजूस अन्य जीवसृष्टी देखील तयार होईल. पाण्यामध्ये मासे, कासव असे जलचर, पाणवनस्पती वाढतील व नविन जीवसृष्टी तयार होईल, अशा दुहेरी उद्देशाने ही जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच बरोबर पाणी टंचाई, तापमानवाढ आदी कारणांमुळे तुटलेली अन्नसाखळी या माध्यमातून जोडण्याचा देखील ते प्रयत्न करीत आहेत. 

निसर्गाने आपणास खुप काही दिले आहे. परंतु आपणास त्याचा विसर पडतो. परंतु आता वेळ आली आहे, निसर्गाच्या ऋणातून उतराई होण्याची, त्यांनी दिलेले कर्ज फेडण्याची, याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. पाणी हे जीवन असून सर्व सजिवांसाठी ते गरजेचे आहे. त्यामुळे तलावांच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचे पुनर्रभरण करण्याबरोबरच तेथे सजिव सृष्टी देखील विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी नागरीकांचे सहकार्य मिळते, परंतु चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com