दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची सरकारदरबारी चेष्टा

drought
drought

लातूर : सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त भागातील मी रहिवासी आहे. तेथे शिक्षणाची सुविधा नसल्याने मला जिल्ह्याच्या ठिकाणी राहावे लागत आहे, असे सांगून आणि याबाबतचे आवश्‍यक ते सर्व पुरावे दाखवूनही एसटी बसचा मोफत पास विद्यार्थ्यांना दिला जात नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या काही जाचक अटींमुळे लातूरमधील शेकडो तर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची सरकारदरबारी चेष्टा होत असल्याचेच स्पष्ट होत आहे.

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या परिस्थितीच्या पाश्‍वभूमीवर ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी बसचा मोफत पास देण्याचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी २९ ऑक्टोबर रोजी घेतला. त्यानंतर एसटी महामंडळाने लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी करत १ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात येतील, असे सांगितले. त्यानूसार विद्यार्थ्यांना मोफत पास दिले जात आहेत. पण, त्यात काही जाचक अटी घातल्यामुळे अनेक लाभार्थी विद्यार्थ्यांना या पासपासून वंचित राहावे लागत आहे. सतत हेलपाटे मारुनही महामंडळाचे अधिकारी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची दखल घेताना दिसत नाहीत.

राज्य सरकारने १५१ तालूके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. त्यात लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या एकमेव तालूक्याचा समावेश होता. या तालुक्यातील महामंडळाच्या कार्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी एसटी बसच्या पाससाठी अर्ज केला आहे, त्याच विद्यार्थ्यांना मोफत पास दिला जात आहे. पण अनेक विद्यार्थी शिक्षणानिमित्ताने गावाबाहेर पडले आहे. काही विद्यार्थी शिक्षणाची सुविधा असलेल्या इतर तालुक्यात तर काही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत आहेत. तिथून ते महाविद्यालयाला एसटी बसने ये-जा करतात. तसे पासही या विद्यार्थ्यांनी मागील महिन्यापर्यंत काढलेले आहेत. पण हे पास शिरूर अनंतपाळ तालूक्याच्या बाहेर काढलेले आहेत, असे कारण सांगून अनेक विद्यार्थ्यांना मोफत बस पास नाकारला जात आहे. दुष्काळग्रस्त तालूक्यातील गावाचा रहिवासी पुरावा दाखवून महामंडळाचे अधिकारी विद्यार्थ्यांना दाद देत नाहीत, असे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालूक्यात यापूर्वी बसचा पास काढला अशाच विद्यार्थ्यांना आम्ही मोफत पास देत आहोत. असा निर्णय केवळ आपल्याकडेच नव्हे राज्यात सगळीकडेच महामंडळाच्या निर्देशानूसार घेण्यात आला आहे. तरीही जे विद्यार्थी मोफत पासपासून वंचित राहत अाहेत, त्यांनी आपले म्हणणे आम्हाला कळवावे. ते आम्ही महामंडळापर्यंत पोचवू.  
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत बस पास देऊ, असे जाहीर केल्यामुळे आमच्यासह अनेक पालकांना दिलासा मिळाला. पण दुष्काळग्रस्त भागातील रहिवासी असूनसुद्धा संबंधीत तालूक्याबाहेर राहत असाल आणि तिथे पूर्वी पास काढलेला असूनसुद्धा ‘तुम्हाला मोफत पास मिळणार नाही’, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक पालकांची सरकारदरबारी घोर निराशा झाली आहे. 
- देवानंद बोचरे, दुष्काळग्रस्त भागातील पालक

या आहेत जाचक अटी
- ज्या तालूक्यात दुष्काळ आहे, त्याच तालूक्यातील महामंडळाच्या कार्यालयात पूर्वी पास काढलेल्यांना मोफत पास मिळेल
- दुष्काळग्रस्त भागातील रहिवासी असूनही इतर तालूक्यातील किंवा जिल्ह्यात तात्पुरते राहणाऱ्यांना ही सुविधा नाही
- शैक्षणिक कारणासाठी संबंधीत दुष्काळग्रस्त तालूक्यात पूर्वी पैसे देऊन पास काढलेला नाही, अशांना मोफत पास मिळणार नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com