परभणी - दुष्काळाने सतत होरपळत असणाऱ्या जिल्ह्यातील ६५ गावांतील ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत असून, बैठकांमधून आंदोलनाची धार वाढविली जात आहे.
परभणी - दुष्काळाने सतत होरपळत असणाऱ्या जिल्ह्यातील ६५ गावांतील ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत असून, बैठकांमधून आंदोलनाची धार वाढविली जात आहे.

तब्बल ६५ गावे दुष्काळाच्या खाईत

परभणी - स्वांतत्र्योत्तर काळापासून परभणी जिल्ह्यातील ६५ गावांच्या भाळी दुष्काळ गोंदला गेला आहे. जलसिंचनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने या ६५ गावांमध्ये पाण्याच्या प्रश्नाने आता उग्ररूप धारण केले आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाची दाहकता सहन केलेल्या या ६५ गावांतील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध आता फुटत चालला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ६५ गाव पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून बैठका सुरू केल्या आहेत.

परभणीसह पाथरी व मानवत तालुक्‍यात या ६५ गावांचा समावेश होतो. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण होतो. सदरील तालुक्‍यांतील दुष्काळी गावे हे गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प व निम्न दुधना प्रकल्प या मुबलक पाणी असणाऱ्या दोन्ही तिन्ही प्रकल्पांतर्गतचा मधला भाग आहेत. शेती सुपीक असूनही या गावात पाण्याच्या दुष्काळामुळे शेतजमीन ओस पडत आहे. गावांमधील हातपंप सतत कोरडे असतात. विहिरी तर १२ महिने तळाला गेलेल्या असतात. त्यामुळे आता वर्षानुवर्षे दुष्काळी दाहकता सहन करणाऱ्या या गावांतील ग्रामस्थांच्या सयंमाचा बांध सुटला आहे. ग्रामस्थांनी ६५ गाव पाणी संघर्ष समिती स्थापन केली असून, त्याद्वारे आंदोलनाची तयारी सुरू करण्यात येत आहे. गेल्या १५  दिवसांपासून या गावांतील ग्रामस्थ एकवटत असून दररोज एका गावात जाऊन आंदोलनाची धार वाढवीत आहेत. १५ दिवसांत २२ ते २३ गावांमधील बैठका पूर्ण करण्यात आल्या आहेत.

कायमस्वरूपी उपाययोजना हवी
पश्‍चिम महाराष्ट्रात राबविलेल्या उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या धरतीवर गोदावरी नदीवर जे बंधारे आहेत, त्यावरून किंवा जायकवाडी प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्पावरून नजीकच्या गावांना पाणी लिफ्ट करून नेता येते. त्या योजना राबविण्याची गरज आहे.

लघु पाटबंधारे पेडगाव पाझर तलाव व मानवत तालुक्‍यातील लघू पाटबंधारे आंबेगाव पाझर तलावात निम्न दुधना प्रकल्पातील उजव्या कालव्याचे, जायकवाडी प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याचे पाणी सदरील तलावांत सोडल्यास तालुक्‍यातील त्या भागातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटण्यास मदत होईल.

‘‘या ६५ गावांना कायम दुष्काळ असल्याने या गावांमध्ये उपसा जलसिंचनाद्वारे पाणी पोचविता येऊ शकते. या योजनचे तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश तातडीने देणे गरजेचे आहे. अन्यथा कालांतराने ही गावे विस्थापित होण्याची भीती आहे. शासनाने वेळीच लक्ष घालून याची दखल घ्यावी व ग्रामस्थांच्या मनातील आंदोलनाचा ज्वालामुखी शांत करावा.
- बाळासाहेब भालेराव पाटील, ६५ गाव पाणी संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com