उमरगा - भूकंपाच्या धक्क्याने अवघ्या 34 सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते झाले. त्यात अनेक जण दगडमातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले. ते दृश्य पाहून सर्वच संपले, अशीच भावना अनेकांच्या मनात होती. मात्र, काही तासांतच खचलेल्यांना मानसिक धक्क्यातून सावरण्याचे आणि त्यांना जगण्याचे बळ तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिले.
त्यांच्यामुळेच आमचे जगणे शक्य झाले, अशा भावना उमरगा, लोहारा तालुक्यांतील भूकंपग्रस्तांनी व्यक्त केल्या. पवार यांच्यासह
भूकंपग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्व संस्था व व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बलसूर (ता. उमरगा) येथे रविवारी कृतज्ञता सोहळा घेण्यात आला.
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील भूकंपाला रविवारी 25 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त कृतज्ञता सोहळा घेण्यात आला. भूकंपग्रस्त भागातील तत्कालीन सरपंचांच्या वतीने पवार यांचा ऋणनिर्देश सन्मानपत्र देऊन या वेळी सत्कार करण्यात आला.
'भूकंपामुळे कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्या वेळी पवार यांनी गावोगावी जाऊन लोकांना मानसिक आधार दिला. मृतदेह काढणे, अंत्यसंस्कार करणे, तात्पुरता निवारा उपलब्ध करणे, शेती अवजारे देणे, गावांचे पुनर्वसन करणे, यासाठी त्यांनी तत्काळ यंत्रणा कामाला लावली. त्यांच्यामुळेच आम्हाला जगणे शक्य झाले. भूकंपाचे दुःख मोठे होते; पण त्या वेळी मिळालेल्या मानसिक आधारामुळे कोणालाही आत्महत्या करावी वाटली नाही,' अशा भावना भूकंपग्रस्तांनी व्यक्त केल्या.
एकांतात डोळ्यांतून पाणी गळायचे - पवार
भूकंपानंतरची विदारक परिस्थिती योग्य नियोजनाने हाताळण्यात आली. वित्तहानी, मनुष्यहानीच्या भयावह स्थितीचा सामना करण्याचे धैर्य भूकंपग्रस्तांना दिले. त्यांनीही आता रडायचं नाही, उभं राहायचं, अशी खूणगाठ बांधून नव्याने संसार उभारले, याचे आत्मिक समाधान वाटते, असे नमूद करतानाच शरद पवार यांनी, ""मात्र मी एकांतात असायचो, त्या वेळी भूकंपाने झालेल्या हानीमुळे मन सुन्न व्हायचे आणि डोळ्यांतून आपोआप पाणी गळायचे,'' अशी आठवण तब्बल 25 वर्षांनंतर भूकंपग्रस्तांना सांगितली.
|