औरंगाबाद - "जीएसटी', इंधन दरवाढ यामुळे सर्वच जीवनावश्यक बाबींमध्ये दरवाढ झाली; मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरीमध्ये यंदा केवळ दोन रुपयांची वाढ झालेली आहे. मागील चार वर्षांचा विचार केला तर ही वाढ केवळ 35 रुपये आहे. त्यामुळे संसाराचा गाडा हाकताना मजुरांची ओढाताण होत आहे.
शासनामार्फत ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्प, उपक्रमात मजुरांना सहभागी करून घेत त्यांच्या हाताला काम द्यावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. महाराष्ट्राने जन्माला घातलेली ही योजना देशाने स्वीकारली. या योजनेअंतर्गत सद्यःस्थितीत राज्यातील 9 हजार 276 ग्रामपंचायतींच्या अंतर्गत 31 हजार 961 कामांवर सध्या 4 लाख 53 हजार 838 मजूर राबत आहेत; मात्र महागाईच्या तुलनेत मजुरीत वाढ होत नसल्याचे त्यांची आर्थिक घडी विस्कळित झाली आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक कामे नांदेडमध्ये
मराठवाड्यात 1 हजार 179 एवढी सर्वाधिक कामे नांदेड जिल्ह्यात सुरू आहेत. या कामांवर 15 हजार 891 मजूर राबत आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात 181 ग्रामपंचायतींमध्ये 587 कामांवर 5 हजार 792 मजूर आहेत. विभागातील 1 हजार 377
ग्रामपंचायतींमध्ये 3 हजार 896 कामे सुरू आहेत.
जिल्हा....ग्रा.पं.ची संख्या......एकूण कामे......मजुरांची संख्या
बीड.....112.......255.............3,295
नांदेड.....423.....1,179...........15,891
जालना......166.........492.........7,589
लातूर.......148..........410...........4,583
उस्मानाबाद....90.........151...........1,659
परभणी..........100.........286..........3,672
औरंगाबाद.........181........587.......5,792
हिंगोली.........157........536..........8,296
एकूण.......1,377........3,866..........50,777
|