पत्रपेट्यांचे पोट रिकामेच

File photo
File photo

नांदेड : एकेकाळी संदेशवहनासाठी महत्त्वाचे ठरणारे पोस्टकार्ड आधुनिक काळामध्ये कालबाह्य झाले आहे. सद्यस्थितीमध्ये शहराच्या विविध भागांत बसविलेल्या डाक विभागाच्या पत्रपेट्यांतून थैलाभरही पत्र निघत नाही. तर दुसरीकडे प्रत्येकाच्या खिशात असलेल्या मोबाईलमधील वाटसअॅप मात्र कामाच्या कमी आणि अनवान्टेड संदेशांनी फुल्ल झाला आहे. येथे शेकडोवर असलेल्या संदेशाला त्या एका २५ पैशाच्या पोस्टकार्डर्ची सर नाही, असे म्हणणारे कमी नाही. पण, त्यांच्याकडून सध्या एक पोस्टकार्डही लिहिल्या जात नसल्यामुळे डाक विभागाच्या पत्रपेट्या रिकाम्या दिसत आहेत.


सध्या अस्तित्वात असलेला मोबाईल, दूरध्वनीचा शोध लागण्यापूर्वी दूरवर असलेल्या आप्तस्वकीयांची हालचाल माहिती करून घेण्याकरिता केवळ पत्र हाच एकमेव पर्याय होता. पण, दूरसंचार सेवा गतीमान झाली आणि मनाला हुरहूर लावणारी पत्रे बेपत्ता झालीत. पूर्वी या डाक विभागाच्या पत्रपेट्यांतून पोत्याने पत्र निघायचे. आता ती स्थिती नाही. या पत्रपेट्यांतून मोजकेच पत्र निघत आहे. 

दूरसंचारमधील उत्क्रांतीचा पोस्टावर परिणाम
डाक विभागाच्या नियमानुसार या पेट्या दिवसातून तीन वेळी उघडण्यात येतात. या तीनही वेळा मिळून या पेट्यांतून कधी थैलीभरही पत्र निघत नसल्याची माहिती पेट्या उघडणाऱ्या डाक विभागाच्या एका कर्मचाऱ्याकडून देण्यात आली आहे. पूर्वी साधे पोस्टकार्डही घरी आले तर शेजाऱ्यांकडून कोणाचे पत्र रे...म्हणून विचारणा होत होती. पण, आता काळ बदलला आहे. दूरसंचारमध्ये झालेल्या उत्क्रांतीमुळे क्षणात बोलणे सोडा व्हीडीओ काॅलच्या माध्यमातून दूरवर असताना एकमेकांत समोरासमोर संभाषण होत असल्याने पत्राच्या या प्रकाराला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता तर आता उरलेलीच नाही.

आपले काही आहे का
पोस्टमन पत्र घेऊन एखाद्या भागात गेला की त्याच्या कानावर आवाज यायचा. काका...आपले काही आहे का...हा आवाज गेल्या कित्येक दिवसांपासून एेकायला येत नसल्याचे काही निवृत्त तसेच २०-२५ वर्षांपासून काम करणाऱ्या पोस्टमनकडून सांगण्यात येते. त्या तुलनेत आता पोस्टमनही दिसेनासे झाले आहेत.

केवळ शासकीय पत्र होतात पोहोचती
डाक सेवेच्या पत्रव्यवहार विभागातून आता केवळ शासकीय दस्तएेवज नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम होत आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, बॅंकांचे एटीएम कार्ड आणि इतर काही शासकीय दस्तावेज पोहोचविण्यासाठीच हा विभाग आता शिल्लक राहिल्याचे एका पोस्टमनने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘सकाळ’ला माहिती दिली आहे. 

यासाठी उचलले दुसरे पाऊल
बदलत्या काळानुसार पोस्टाचा पत्रासाठीता वापर खूपच कमी झालेला आहे. त्यामुळे पोस्ट खाते टिकवून ठेवण्यासाठी पोस्ट खात्याने विविध स्कीम सुरु करून  दुसरे पाऊल उचलले आहे. त्यात प्रामुख्याने सेविंग्ज अकाऊंट, पाच वर्षांचं रिकरिंग डिपॉझिट, टाइम डिपॉझिट किंवा फिक्स्ड डिपॉझिट, मंथली इन्कम स्कीम अकाउंट, सिनियर सिटिझन्स सेविंग्ज स्कीम, १५ वर्षाचा पीपीएफ, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम, पाच वर्षाचं नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट, कुरिअर आदींचा समावेश आहे.
 
पोस्टातील वर्दळ कायम
आधुनिक काळातही पोस्टाच्या रजिस्टर, स्पीडपोस्ट, कुरिअर यांसारख्या सुविधांचा नागरीक मोठ्या प्रमाणावर फायदा करून घेत आहेत. पार्सल सुविधाही माफक दरात मिळत असल्याने त्याला नागरिकांकडून पसंती मिळत आहे. शासकीय कागदपत्रे सुरक्षित पाठविण्यासाठी पोस्टाशिवाय पर्याय नाही. वैयक्तिक पत्रव्यवहार कमी झाला असला तरी, पोस्टातील वर्दळ कमी झालेली नाही.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com