औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृध्दी महामार्गाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी गुरुवारी (ता. 20) औरंगाबाद तालुक्यातील पळशी येथे निदर्शने व आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सुरू असतानाच जवळच्याच कच्ची घाटी परिसरातील शेतात तहसीलदार व मोजणी पथक आल्याची माहिती कळताच या मोजणीला विरोध करत एका कालू शेख या शेतकऱ्याने पथकासमोरच विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
समृध्दी महामार्ग प्रकल्पात आपली सगळी शेतजमीन जात असल्याचे सांगत कालू शेख या शेतकऱ्यांने मोजणी करण्यास पथकाला विरोध केला होता. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची बागायती जमीन समृध्दी महामार्गाच्या प्रकल्पात जाणार असल्याने या भागीतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे.
मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यानच लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध दर्शवला आहे. तरी देखील जमीनीची मोजणी होत असल्याच्या निषेधार्थ पळशी येथे भाकप व कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ही निदर्शने सुरु असतांनाच तालुक्यातील कच्ची घाटी परिसरात तहसीलदारांसह मोजणी पथक आल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, या प्रकल्पात आपली संपुर्ण जमीन जात आहे, मला माझी शेती द्यायची नाही असे म्हणत कालू शेख या शेतकऱ्यांनी पथकास मोजणी करण्यास मज्जाव केला. पण पथक ऐकत नसल्याचे पाहून कालू शेख याने जवळच असलेली विषाची बाटली काढली आणि ते पित आत्महत्येचा प्रयत्न केला.
|