लासूर स्टेशन - लासूर स्टेशन (ता. गंगापूर) परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चार-पाच वर्षांपूर्वी वीजजोडणी मिळावी म्हणून अर्ज करत कोटेशनही भरले. मात्र, महावितरण कंपनी दिरंगाई करत आहे.
शेतकऱ्यांना तत्काळ वीजजोडणी द्या, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा अंबादासभाऊ व्यवहारे प्रतिष्ठानने महावितरणच्या उपकार्यकारी अभियंतांना दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथील गट नंबर 54, 62, 70, 75 तसेच चिंचखेडा शिवारातील गट नंबर 43 मधील शेतकऱ्यांनी सन 2011, 2012 मध्ये वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयाकडे कोटेशन भरले. मात्र, पाच वर्षांचा कालावधी उलटूनही त्यांना वीजजोडणी मिळालेली नाही. वीज न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. महावितरण कार्यालयाने तत्काळ या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
'संबंधित शेतकरी मागील चार-पाच वर्षांपासून वीजजोडणीसाठी महावितरण कार्यालयात खेट्या मारत आहेत. त्यांनी रीतसरपणे कोटेशनही भरले आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकरी डबघाईला आला असून तत्काळ वीजजोडणी न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.''
- गणेश व्यवहारे, लासूर स्टेशन
'माझी चिंचखेडा शिवारात गट नंबर 43 मध्ये शेती असून मी कोटेशन भरून चार वर्षांपूर्वी सिंगल फेज जोडणीची मागणी केली. मात्र, मला अजूनही वीजजोडणी मिळालेली नाही. त्यामुळे पाणी असूनही पिके वाळत आहेत.''
- ज्ञानेश्वर पटरे, शेतकरी, शिरेगाव
मुख्य अभियंता गणोरकर....इकडेही लक्ष द्या!
महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणोरकर यांनी ग्रामीण भागातील प्रश्नाकडेही लक्ष घालून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी आहे. वीजबिल वसुली मोहीम राबवून चांगला महसूल जमा केला. हा कामाचाच भाग आहे. वसुलीच्या कामाचा एवढा डंका पिटणाऱ्या अधिकाऱ्यांनी चार-पाच वर्षे होऊनही शेतकऱ्यांना वीजजोडणी का दिली नाही, याचे आत्मचिंतन करावे. रोहित्र जळाल्यानंतर ते बदलून देण्यासाठी काय काय खटाटोप करावे लागतात, याचीही माहिती घ्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
|