शेतकऱ्यांना खत, बियाणे खरेदीची चिंता

hingoli photo
hingoli photo

कळमनुरी (जि. हिंगोली): कोरोनामुळे सर्व व्यवहार लांबणीवर पडले आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी वर्गाकडून खते खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र जिल्ह्यासाठी खताची एकही रॅक उपलब्ध झाली नाही. दुसऱ्या बाजुला कृषी केंद्र चालकांनाही जिल्हा प्रशासनाने खते बियाणे विक्री करण्याकरिता नियमित वेळापत्रक देण्याची मागणी पुढे आली आहे.

कोरोनामुळे सर्व अर्थचक्र व व्यवहार ठप्प झाले आहे. या स्थितीत आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी वर्गामधूनही मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. 

सात हजार ४२० मेट्रिक टन खतसाठा आवश्यक

मात्र जिल्ह्यासाठी मंजूर असलेले खताचे आवंटन अद्यापपर्यंत रॅक न लागल्यामुळे खतसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. खरीप हंगामासाठी ६५ हजार २३० मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यात रॅक लागून सात हजार ४२० मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध होणे आवश्यक होते.

दहा हजार मेट्रिक टन खतांची खरेदी

मात्र सद्य:स्थितीत आजाराच्या पार्श्वभूमीवर कामगारांची कमतरता व इतर काही कारणांमुळे रॅकच्या माध्यमातून खतसाठा उपलब्ध झाला नाही. शेतकरी वर्गाकडून खतांची वाढती मागणी पाहता कृषी केंद्र चालकांनी नांदेड व परभणी येथून दहा हजार मेट्रिक टन खतांची खरेदी करत शेतकऱ्याच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न चालवला आहे. 

खते खरेदी करण्यासाठी लगबग

मात्र हा प्रयत्न तोकडा ठरला आहे. खरीप हंगामाकरिता शेतकरी वर्गाकडून डीएपी, २०. २०. ०. १३, १० २६. २६, युरिया या खताला अधिक मागणी आहे. व्यापाऱ्यांनी नांदेड, परभणी येथून खरेदी केलेला खतसाठा अपुरा आहे. त्यातच पुढील काळात खताची टंचाई जाणवेल या हिशोबाने शेतकऱ्यांनीही खते खरेदी करण्यासाठी लगबग सुरू केली आहे.

कृषी केंद्र चालक सापडले अडचणीत

खताच्या २५ रॅक लागणे आवश्यक आहेत. मात्र रँक न लागल्यामुळे कृषी केंद्र चालक ही अडचणीत सापडले आहेत. दुसऱ्या बाजुला कृषी केंद्र चालकांना एक दिवस आड ठराविक वेळेत खते व बियाणे विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या वेळेत खरेदी-विक्रीचे व्यवहार शक्य होत नसल्यामुळे तीन मेपासून पुढील काळात कृषी केंद्र चालकांना नियमाच्या अधीन राहून ठराविक वेळेत नियमित खते व बियाणे खरेदी विक्री करण्याची परवानगी देण्याची मागणी पुढे आली आहे.

खत कंपन्यांशी पत्रव्यवहार

एकंदरीत आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खताच्या रँक न लागल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या असून संबंधित विभागाने यासंदर्भात कृषी आयुक्त व खत कंपनीच्या मुंबई येथील आरसीएफ युरिया व सिकंदराबाद येथील कोरोमंडळ खत कंपन्यांशी पत्रव्यवहार करून रॅक लावण्यासंदर्भात पत्रव्यवहार चालविला आहे. 

सोयाबीन व कापूस बियाणाची मागणी

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीकरिता बँकेत आपल्या नावे जमा असलेली रक्कम काढून खते व बियाणे खरेदी करण्यासाठी धावपळ चालविली आहे. खत खरेदी प्रमाणेच शेतकरी वर्गाकडून सोयाबीन व कापूस बियाणाची मागणी होत आहे. सोयाबीन बियाणे मध्यप्रदेशमधून ; तर कापूस बियाणे आंध्रप्रदेश येथून मागण्याकरिता कृषी केंद्र चालकांनी आपली मागणी नोंदविली आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com