औरंगाबाद - "गेट टुगेदर' करण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात वाशी (ता. उस्मानाबाद) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील पाच शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
उस्मानाबाद येथील खासगी क्लासेस चालविणारे 19 शिक्षक 13 नोव्हेंबर 2016 रोजी वैजनाथ खोसे यांच्या सोनेगाव शिवारातील शेतामध्ये गेट टुगेदर करण्यासाठी गेले होते. त्या वेळी अविनाश औताडे हे शिक्षक पाझर तलावात पोहण्यासाठी गेले व पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी सर्व शिक्षकांचे व संबंधितांचे जबाब नोंदविले. घटनेच्या पाच महिन्यांनंतर मृत अविनाश यांच्या पत्नीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेऊन संशय व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक रविकांत शितोळे, अमोल निंबाळकर, वैजनाथ खोसे, गोविंद चव्हाण आणि वॉर्डन जयाजी वाखुरे अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिक्षकांनी गुन्हा करण्याचा न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली. सुनावणीनंतर खंडपीठाने आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. दरम्यान, पाचही शिक्षकांनी अटकपूर्व जामीन मिळवा म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर खंडपीठाने पाचही शिक्षकांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. नितीन गवारे, शशिकिरण पाटील, गोकूळ शिनगारे यांनी काम पाहिले.
|