वसमत(जि. हिंगोली) : येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा टोकाई कारखान्याचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तीन दिवसांपासून गरजूंना अन्नाची पकिटे वाटपास सुरवात केली आहे. संपूर्ण संचारबंदीच्या काळात (ता.१४) पर्यंत हा उपक्रम सुरूच ठेवणार असून कार्यकर्ते, पदाधिकारी, बुथप्रमुख, शाखाप्रमुख यांच्या माध्यमातून वाडी, वस्ती, तांडे, पालांवर पुरविली जाणार आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी सूरू आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांना अडचणी येत आहेत. या काळात कोणी उपाशीपोटी राहू नये, यासाठी ॲड. शिवाजीराव जाधव हे गरजूंना घरपोच अन्नाची पाकिटे वाटप करीत आहेत. घरी अन्नाची पाकिटे तयार करून ती गरजूंपर्यंत पोचती केली जात आहेत.
हेही वाचा - निर्जंतुकीकरणासाठी खासदार हेमंत पाटील रस्त्यावर
रुग्णांनादेखील अन्नाची पाकिटे
तसेच शहरातील उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय येथे असलेल्या रुग्णांनादेखील शिवाजीराव जाधव यांच्यातर्फे अन्नाची पाकिटे वाटप केली जात आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत सोशल मीडियाद्वारे कोणीही घराबाहेर पडू नये, असा संदेश दिवसभरातून नागरिकांना दिला जात आहे. त्यानुसार कोरोनासंदर्भात नागरिक दक्षता घेत आहेत.
आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला
प्रशासनाला सहकार्य करा, कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्या भोजनाची व्यवस्था करा, विनाकारण रस्त्यावर फिरू नका, पोलिसांसोबत वाद घालू नका, आरोग्याची काळजी घ्या, बाहेरून आलेल्या नागरिकांची प्रशासनाला वेळोवेळी माहिती द्या, असे आवाहनही ॲड. जाधव करीत आहेत. दरम्यान, गरजू व्यक्तींना त्यांनी मदत करण्याचा संकल्प केला असून लॉकडाउनचा कार्यकाळ संपेपर्यंत अन्नदान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या उपक्रमाचे कौतूक होत आहे.
गर्दी टाळण्याासाठी अनुदानाचे वाटप थांबविले
गिरगाव : वसमत तालुक्यातील गिरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीकविमा, निराधारांचे अनुदान वाटप कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली आहे. गिरगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. सोयाबीन, ज्वारी पिकाच्या विम्यासह पंतप्रधान किसान सन्मान योजना, निराधाराचे अनुदान, उसाची बिले आदींची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
हेही वाचा - लॉकडाउनचा रेशीम उत्पादकांना फटका
बँकेत गर्दी होणार नाही याची दक्षता
सध्या लॉकडाउनमुळे तसेच संचारबंदी व जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. बँकेत गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. या बँकेत गिरगावसह परजना, खाजमापूरवाडी, बोरगाव खुर्द, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द ही गावे बँकेअंतर्गत येतात. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी (ता.१४) एप्रिलपर्यंत वाटप थांबवावे, असे पत्र परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे या शाखेतही अनुदान वाटप थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.