स्वातंत्र्यसैनिकांच्या वृद्ध पत्नीची पेन्शनसाठी परवड

केशरबाई सदाशिव तुपे, स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी
केशरबाई सदाशिव तुपे, स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी


फुलंब्री (जि.औरंगाबाद) : पतीच्या निधनानंतर म्हातारपणी स्वतःची गुजराण व्हावी म्हणून शासनाकडून दिले जाणारे पेन्शन मिळण्यासाठी आडगाव खुर्द (ता. फुलंब्री) येथील केशरबाई सदाशिव तुपे या 95 वर्षांच्या आजीबाई जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारीत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.


महाराष्ट्र शासनाने 29 ऑगस्ट 2018 रोजी स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तिवेतन मंजूर केलेले आहे. त्यामुळे सुरवातीला सदाशिव कडुबा तुपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह नागपूरच्या आयुक्त कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर 27 डिसेंबर 2018 रोजी स्वातंत्र्यसैनिक सदाशिव कडुबा तुपे यांचे निधन झाले. त्यामुळे जानेवारी महिन्यात स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नी केशरबाई सदाशिव तुपे यांनी वारस प्रमाणपत्र काढून वारसाने पेन्शन मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला.

कागदपत्रे दाखल करून वारसाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यावेळी तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितले, की तुमची संचिका नागपूरच्या आयुक्तांकडे पाठवली असून, तेथून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल. आजीबाईने दोन महिने जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारल्या. दोन महिन्यांनी नागपूर आयुक्तांनी मंजुरी देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात संचिका पाठवून पुढील प्रक्रियेसाठी मार्ग खुला केला. त्यानंतर जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे वारस प्रमाणपत्रे देऊन केशरबाई यांनी स्वाक्षरी करून सर्व कागदपत्रे पुन्हा दिली. या कार्यालयात पुन्हा केशरबाई तुपे यांनी तीन महिने चकरा मारल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी टोलवाटोलवी करून वेळ मारून नेत आहेत. पेन्शन मिळण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नीला वृद्धापकाळात कर्मचाऱ्यांच्या आडमूठ धोरणामुळे खेट्या माराव्या लागत आहेत.

सहा महिने चकरा मारल्यानंतर शेवटी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातून फुलंब्री येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या नावाने पीपीओ महालेखापाल, नागपूर यांनी 23 ऑगस्टला अहवालासह पुढील कार्यवाही करण्याचे पत्र पाठविले. त्यानंतर पुन्हा केशरबाई यांनी फुलंब्रीतील स्टेट बॅंक गाठली. येथेही त्यांच्या पदरात निराशाच पडली. तेथील व्यवस्थापकास माहिती द्यायला वेळ नाही. त्यांनी बॅंकेतील एका महिला कर्मचाऱ्याकडे त्यांना पाठविले. त्या महिला कर्मचाऱ्याने सांगितले, ""आम्ही पेन्शन देत नाही. कोषागार अधिकाऱ्यांनी पैसे पाठविले तर आम्ही बॅंकेत त्यांच्या खात्यावर जमा करू.'' पुन्हा केशरबाई यांनी मुलाला घेऊन 16 सप्टेंबरला जिल्हा कोषागार कार्यालय गाठले. तेथेही "आमच्याकडून सर्व प्रक्रिया झालेली असून, पुढील काम बॅंकेचे आहे, आमचे नाही,'' असे त्यांना सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष
देऊन पेन्शन सुरू करावी

आठ महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांत केशरबाई चकरा मारीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे केशरबाई तुपे यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. किमान त्यांच्या वयाचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन तत्काळ पेन्शन सुरू करावी, अशी मागणी केशरबाई सदाशिव तुपे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com