अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच इंधन

जालना : संचारबंदीमुळे उड्डाणपुलावरील शुकशुकाट.
जालना : संचारबंदीमुळे उड्डाणपुलावरील शुकशुकाट.

जालना -  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यामध्ये संचारबंदी आहे. त्यामुळे या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच पेट्रोलपंप चालकांनी इंधन पुरवठा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शुक्रवारी (ता.२७) दिले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी देशात लॉकडाऊन लागू केले आहे; मात्र तरी देखील खासगी वाहने रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे जमावबंदीच्या कालावधीमध्ये इतर सर्व खासगी वाहनांना पेट्रोलपंप चालकांनी इंधनाचा पुरवठा करू नये. तसेच खासगी दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जमावबंदीच्या कालावधीमध्ये रस्त्यावर फिरण्यास सक्त मनाईचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये दिले आहेत.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनामध्ये पिण्याचे पाणीपुरवठा, सांडपाणी, निचरा व्यवस्थापन, रुग्णालये, पॅथॉलॉजी-लॅबरोटरी, सर्व प्रकारचे दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, शववाहिका, किराणा सामान दुकानदार, खाद्यतेल, अन्नधान्य, दुग्ध, दुग्ध उत्पादने, फळे, भाजीपाला वाहन, गॅस, औषधालये, अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कर्मचारी, तसेच सक्षम अधिकारी यांनी परवाना दिलेली वाहने यांनाच पेट्रोलपंप चालकांनी इंधन पुरवठा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जारी केला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

विलगीकरण कक्षात नव्याने सातजण दाखल 

 जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शुक्रवारी (ता. २७) नव्याने सातजण दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. परदेशातून जिल्ह्यात प्रवास करून आलेल्या एकूण ७३ रुग्णांना आतापर्यंत विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ७१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यातील ५४ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आले आहेत. त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १४ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

रुग्णालयातून सुटी मिळालेल्यांना होम क्वारंटाइन 

रुग्णालयातून सुटी मिळालेल्या सर्व व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकूण १०७ परदेश प्रवास केलेल्या व्यक्तीपैकी १०३ व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे; तसेच इतर शहरे व राज्यांतून आलेल्या ७४९ व्यक्तीचे तपासणीअंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यात एकूण १५ संस्था अलगीकरणासाठी निवडण्यात आल्या असून, त्यामध्ये १ हजार ५३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com