गेवराई, मानवत - बागपिंपळगाव (ता. गेवराई) येथील शेतकरी हनुमान आसाराम थोरात (वय 32) यांनी बुधवारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सातच्या सुमारास गावातील मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर घराचा दरवाजा बंद करून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. याच तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील शेतकरी महादेव सटवाजी मार्कड (वय 48) यांनी मंगळवारी सायंकाळी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, परभणी जिल्ह्यात नापिकी, कर्ज, मुलीच्या लग्नासाठी पैशांच्या विवंचनेतून मानोली (ता. मानवत) येथील शेतकरी निवृत्ती लक्ष्मण मोरे (वय 40) यांनी आज विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंक, फायनान्सचे तीन लाख रुपये कर्ज झाले होते, असे सांगण्यात आले.
|