निलंग्यात गरजू कुटुंबांना किराणामालाचे वाटप, माणुसकीसाठी मदतीचा हात

Coronaviru Affects Poor, Nilanga News
Coronaviru Affects Poor, Nilanga News

निलंगा  (जि.लातूर) ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा (लॉकडाऊन) सर्वाधिक फटका मोलमजुरी करणाऱ्या व भटक्या विमुक्त समाजाला बसला आहे. या लोकांना मजुरी व पोटासाठी भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने भटक्या विमुक्त संघटना व श्रमिक विकास संस्था, निलंगा यांच्यावतीने अशा १०० गरजू कुटुंबांना दहा क्विंटल तांदूळ व किराणामालाचे वाटप करण्यात आले.


निलंगा येथे हे उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे गरीब मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची वस्ती आहे. यासोबतच निलंगा येथे वडार, मसणजोगी, कैकाडी, पारधी, शिकलकरी, घिसाडी यासह भटक्या-विमुक्त समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहतात. जगासह देशात कोरोना या जीवघेण्या विषाणुने थैमान घातले आहेत. या कोरोना विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून शासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या झोपडपट्टीतील व पालीवरील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या समाजातून आपण आलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही माणुसकीची भावना जोपासत झोपडपट्टीतील गरीब माणसांना मदत करण्यासाठी भटक्या-विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते विलास माने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रविवार (ता.२९) आपल्या "उपरा " या निवासस्थानी शंभर गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, गोडतेलाचे एक किलोची एक पाकीट, कपड्याचे व अंगाचे साबण यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी कलावती माने, विकास माने, दशरथ जाधव, वैजनाथ जाधव, भाग्यश्री माने, आशाताई जाधव, इंदरकौर टाक आदी उपस्थित होते.


रक्तदानासाठी सरसावले असंख्य लातूरकर
लातूर : राज्यात सगळीकडे रक्ताचा तुटवडा आहे, अशी माहिती आमच्यापर्यंत पोचली आली आहे. आपल्या शहरातही रक्ताचा तुटवडा आहे का? आम्ही रक्त द्यायला तयार आहोत. कधी येऊ? अशी विचारणा करणारे असंख्य दुरध्वनी शहरातील वेगवेगळ्या रक्तपेढीत खणखणायला सुरवात झाली आहे. नुसतेच दुरध्वनी नाही तर रक्तदानासाठी रक्तपेढीत लातूरकर चकरा मारतानाही दिसत आहेत. यातून लातूरकरांचे सामाजिक भान दिसून येत आहे.


कोरोना विषाणूचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, रक्ताचा तुटवडा सर्वत्र जाणवू लागला आहे. लातूरातही वाढत्या उन्हामुळे रक्तदानासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते. पण, आता लोकांमध्ये जागरूकता वाढल्याने रक्तदात्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. दुरध्वनी करून मी रक्तदानासाठी कधी येऊ, अशी स्वत:हून विचारणा केली जात आहे. एका रक्तपेढीत दिवसाला दहा ते १२ जण रक्तदानासाठी येत आहेत. काही रक्तपेढीत रक्तदान शिबिरांचेही आयोजन होत आहे.
लातूरकरांच्या या सहकार्यामुळे आणि सुजाणपणामुळे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा नाही, असे दिसून येत आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रक्तपेढीत रक्तदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची येण्या-जाण्याची मोफत सोय प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नागरिकांनी येथील रक्तपेढी दूरध्वनी केल्यानंतर रक्ताची नेमकी गरज कधी आहे, हे सांगितले जात आहे.

त्या दिवशी वाहन पाठवून संबंधीत व्यक्तीला रक्तदानासाठी रक्तपेढीत आणले जात आहे. रक्तदान झाल्यानंतर सरकारी वाहनातून घरी सोडले जात आहे. याशिवाय, रक्तदानासाठी शिबिरेही घेतली जात आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ओम क्लासिक अपार्टमेंट येथील रहिवाशांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिर घेतले. या शिबिरात प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, पोलिस कर्मचारी, गृहिणी, वकील अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींनी रक्तदान केले. तर भालचंद्र रक्तपेढीत रेल्वे स्थानिकामधील ४२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. वेगवेगळ्या सामाजिक संस्थाही रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या तयारीत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com