Latur Zilha Parishad News, Latur News
Latur Zilha Parishad News, Latur News

मसूर डाळीच्या पिशवीत हरभरा, लातूर जिल्ह्यात पोषण आहरातील प्रकार

लातूर : अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या खाऊमध्ये टाळेबंदीच्या काळात चांगलीच गडबड झाल्याचे पुढे येत आहे. मसूरडाळ तसेच चवळीच्या पिशवीत हरभरा (चणा) देण्यात आला असून जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्यांत हा प्रकार घडला आहे. टाळेबंदीमुळे हरभरासाठी पॉलिथीन उपलब्ध न झाल्यामुळे हा प्रकार झाल्याचे पुरवठादार सांगत आहे. दरम्यान, अंगणवाड्यांना देण्यात येणारे विशिष्ट धान्यही कमी देण्यात आलेले नाही. तरीही जिल्हा परिषदेकडून प्रकाराची चौकशी करण्यात येणार आहे.


जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) डी. बी. गिरी यांनी ही माहिती दिली. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील अंगणवाडीतील बालकांना पोषक आहार (खाऊ) देण्यात येतो. अंगणवाडी सुरू असताना शिजविलेला आहार देण्यात येत होता. त्यासाठीचे धान्य, कडधान्य व पदार्थ पुरवठादारांकडून वाटप केले जातात. टाळेबंदीमुळे अंगणवाड्या बंद पडल्या. यामुळे बालकांना शिजविलेल्या आहाराऐवजी धान्य व पदार्थांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे वाटप एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाले असून अजूनही ते सुरू आहे. त्यानंतर मसूरडाळ व चवळी लिहिलेल्या पॉलिथीनच्या पिशवीमध्ये हरभरा आढळून आला. पुरवठादाराने टाळेबंदीच्या आडून कमाई करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याची चर्चा घडून आली.

ग्रामीण भागात बहुतांश अंगणवाड्यांत घडलेला हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. याची चौकशीही करण्याची मागणी होऊ लागली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन चौकशीचे आदेश दिले होते; मात्र प्राथमिक चौकशीत काही गडबड झाली नसल्याचे दिसून येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी यांनी सांगितले. पोषक आहाराचे धान्य, कडधान्य व अन्य पदार्थ पॉलिथीनच्या बंद पिशवीत दिले जातात; मात्र टाळेबंदीमुळे पॉलिथीनच्या पिशव्या पुरवठादाराला उपलब्ध झाल्या नाहीत. त्याच्याकडे मसूरडाळ व चवळी लिहिलेल्या पिशव्या जास्त संख्येने उपलब्ध होत्या. आम्हाला विचारून त्याने या शिल्लक पिशव्या हरभरासाठी उपयोगात आणल्याचे गिरी यांनी सांगितले. तरीही प्रत्यक्ष भेटी देऊन या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पुरवठ्यात बदल नाही
या प्रकारात बालकनिहाय निश्चित केलेल्या धान्य, कडधान्य व पदार्थांच्या पुरवठ्यात काहीही बदल झाल्याचे दिसून येत नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिकांकडून तशा तक्रारीही आलेल्या नाहीत. पिशव्यांत बदल झालेला असला तरी धान्य, कडधान्य व अन्य पदार्थ्यांच्या पुरवठ्यात प्रमाणानुसार बदल झालेला नाही, असे गिरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com