कोट्यवधींच्या वीजबचतीवर "हायमास्ट'ने फेरले पाणी!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद-वीजबचतीच्या नावाखाली शहरातील 40 हजार जुने पथदिवे बदलून त्या ठिकाणी नवे एलईडी पथदिवे लावण्यासाठी महापालिका ऐपत नसताना तब्बल 120 कोटी रुपये खर्च करीत आहे. या प्रकल्पामुळे पथदिव्यांच्या बिलात मोठी घट झाल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात असला तरी दुसरीकडे शहरातील हायमास्टची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या 245 एवढी हायमास्टची संख्या झाली आहे. शंभराहून अधिक हायमास्टवर सुमारे 400 वॅटच्या नऊ फिटिंग लावण्यात आल्या आहेत, तर उर्वरित 12 मीटर उंचीच्या हायमास्टवर सुमारे एक हजार वॅटचे दिवे दिवस-रात्र जळत आहेत. त्यामुळे एकीकडे बचत तर दुसरीकडे विजेचा अपव्यय होत असल्याचे चित्र शहरात आहे. 

महापालिकेने शहरातील 40 हजार पथदिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे व 1200 खांब लावण्याचे काम इलेक्‍ट्रॉन एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस कंपनीला दिले आहे. या कंपनीने 40 हजारपैकी 38 हजार 48 दिवे शहराच्या विविध प्रभागांत बसविले आहेत. एलईडी लाईटमुळे वीजबिलात 50 टक्के बचत होईल, असा दावा ही निविदा मंजूर करताना प्रशासनातर्फे करण्यात आला होता. मात्र, नंतर प्रशासनाने वीजबिलात 27 टक्केच बचत होईल, असा नवा दावा केला. मात्र, काम अंतिम टप्प्यात आलेले असताना पथदिव्यांच्या वीजबिलात केवळ 10 टक्केच बचत होत असल्याचे सप्टेंबर महिन्यात समोर आले होते. 

पथदिव्यांच्या विजेचे महापालिका महिन्याला 1 कोटी 25 लाख रुपये बिल भरते. हा खर्च आता 80 लाखांवर आला आहे. पूर्णपणे काम झाल्यानंतर एकूण वीजबिल 75 लाखांपर्यंत बचत होईल, असे दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. एकीकडे वीजबिलांच्या बचतीसाठी महापालिका प्रकल्पावर 120 कोटी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे नगरसेवकांच्या हट्टापोटी प्रत्येक वॉर्डात हायमास्टच्या रूपाने नको तेवढा उजेड पाडला जात आहे. अनेक रस्त्यांवर तर अवघ्या काही फुटांवर हायमास्ट लावण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेवर लाखो रुपयांच्या वीजबिलाचा भुर्दंड पडत आहे. 

हायमास्टमुळे महापालिकेला दुहेरी फटका बसत आहे. 30 मीटर उंचीचे हायमास्ट उभारण्यासाठी तब्बल एक ते दीड लाखांपर्यंत खर्च येतो, तर दुसरीकडे एका हायमास्टवर जास्तीत जास्त नऊ फिटिंग लावल्या जातात. एक फिटिंग 400 वॅटची असते. त्यामुळे 30 मीटर उंचीच्या वॅटवर तब्बल साडेतीन हजार वॅट वीज जळते. 12 मीटर उंचीच्या हायमास्टवर सरासरी एक हजार वॅट वीज जळते. त्यामुळे महापालिकेच्या वीजबचतीवर हायमास्टमुळे पाणी फेरले जात आहे. 

अनेक धार्मिक स्थळे, महापालिकेने भाड्याने दिलेले सामाजिक सभागृह यांचे वीजबिलही महापालिकेच्या नावानेच येत आहे. एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तर रात्रीतून सहा हजार वॅट विजेचा अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com