लातूर : यमाच्या दाढेतून सावित्रीने सत्यवानाला सोडवून आणले. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटसावित्री पोर्णिमा सण साजरा करतात. रविवारी (ता. १६) हा सण सर्वत्र साजर होत असतानाच भातांगळी (ता. लातूर) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा तसेच मेव्हण्याचा सुरीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या पतीस ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे भातांगळी येथे वटपोर्णिमेच्या सणावर मात्र शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, थेरगाव (ता. शिरुर अनंतपाळ) येथील विलास शिवाजी भोपळे (वय ३९) याच्याशी भातांगळी (ता. लातूर) येथील सुवर्णा (वय ३५) यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला होता. पण चारित्र्याच्या संशयावरून सातत्याने विलास आपल्या पत्नीला त्रास देत होता. दोघात भांडणेही होत असे. काही दिवसापूर्वी सुवर्णा भोपळे या भातांगळी येथे माहेरी आल्या होत्या. रविवारी (ता. १६) मध्यरात्री सुवर्णा भोपळे या आई, भाऊ यांच्यासोबत घराच्या अंगणात झोपल्या होत्या. यावेळी विलास भोपळे तेथे आला. त्याने पत्नी सुवर्णा यांच्यावर सुरीने वार केले. त्यानंतर त्याने मेव्हणा युवराज निरुडे (वय २३) याच्यावरही वार केले. यात दोघांचाही मृत्यू झाला. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सासू भागिरथी निरुडे यांच्यावरही विलास भोपळे याने वार केल्याने त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विलास भोपळे याला अटक केली आहे. सर्वत्र वटपोर्णिमेचा सण साजरा होत असतानाच भातांगळी येथे एकाच घरात दोन खून झाल्याने या सणावर शोककळा पसरली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.