औरंगाबाद - नोटाबंदीदरम्यान हजार, पाचशे रुपयांच्या माध्यमातून काळापैसा विविध खात्यांत भरण्यात आला होता. संशयित खातेधारकांना या पैशांचा तपशील मागितल्यानंतरसुद्धा हिशेब न दिल्याबद्दल खात्यात जमा केलेल्या पैशांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. एक मार्चपासून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान मंगळवारी (ता. सात) औरंगाबाद, बीड जिल्ह्यांत अनुक्रमे तीन व दोन ठिकाणी छापे टाकले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार - सोमवारी (ता. सहा) सायंकाळी पाचच्या दरम्यान हिंगोली व वसमतच्या पाच व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाच्या "ऑपरेशन क्लीन मनी'च्या पथकाने छापे टाकले होते. या सर्व व्यापाऱ्यांच्या दस्ताऐवजांची तपासणी मंगळवारी पहाटपर्यंत सुरू होती.
यादरम्यान बेहिशेबी साडेतेरा कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली. यापैकी साडेनऊ कोटी रुपये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत वळविण्यात आले. उर्वरित साडेचार कोटी रुपयांवर दंडात्मक कारवाई करून कर वसूल करण्यात आला. ही कारवाई सुरू ठेवत पथकाने मंगळवारी दुपारनंतर औरंगाबादमधील तीन; तर बीडमधील दोन बेहिशेबी संपत्ती असणाऱ्या संशयित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ही कारवाई सुरू असल्याने कारवाईमध्ये समाविष्ट असलेले व्यापारी व आकडेवारीचा तपशील कळू शकला नाही. ही ऑपरेशन क्लीन मनीची कारवाई मराठवाड्यात सहायक आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंके यांच्या नेतृत्त्वाखाली त्या-त्या जिल्ह्यातील प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या सहकार्याने होत आहे.
|