औरंगाबाद - पिकाला विम्याचे कवच घेतल्याने परतव्यासाठी पात्र ठरलेल्या मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या जवळपास 36 लाख 77 हजारांवर पोचली आहे. हिंगोली चित्र अजूनही स्पष्ट नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
2017 -18 च्या खरीप हंगामात प्राधनमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील 63 लाख 99 हजार शेतकऱ्यांनी 30 लाख 46 हजार हेक्टरवरील खरिपाच्या पिकांना विम्याचे कवच घेतले होते. नैसर्गिक आपत्तीने विमा मिळणार हे स्पष्ट झाले. परंतु हिंगोली, लातूर आणि जालन्यातील विमा परतव्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीचा प्रश्न कायम होता. जालन्यातील कोडे सुटल्यानंतर हिंगोली व लातूरचे कोडे कायम होते. आता लातूरचे चित्र स्पष्ट झाले; परंतु हिंगोलीची अधिकृत माहिती अजून कृषीच्या विभागस्तरावर आलीच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मराठवाड्यातील नेमक्या किती शेतकऱ्यांना विम्याच्या परतावा मिळणार हे कोडे कायम होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर व हिंगोली वगळता सहा जिल्ह्यांतील 30 लाख 98 हजार शेतकऱ्यांना 1393 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला होता. आता लातुरातील विमा परताव्याचा प्रश्न मार्गी लागल्याने त्यामध्ये लातूरची परतावा रक्कम व लाभार्थी शेतकऱ्यांची त्यामध्ये भर पडली आहे.
लातूरमधील दुसऱ्या यादीत 2 लाख 71 हजार शेतकरी
लातूर जिल्ह्यात गत हंगामासाठीच्या कार्यरत नॅशनल इन्शूरन्स विमा कंपनीचे विजय पस्तापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 3 लाख 8 हजार 478 शेतकऱ्यांना 134 कोटी रुपयांचा विमा परतावा देण्याची प्रक्रिया पार पडली होती. आता नव्याने 2 लाख 71 हजार 250 शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे प्राप्त झाली. विमा परताव्यापोटी 56 कोटी 86 लाख रुपयांची रक्कम रिलीज होऊन विमा परतावा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यासाठी लागलीच बॅंकेकडे पाठविला जाणार असल्याचे श्री. पस्तापुरे म्हणाले.
जिल्हानिहाय पात्र लाभार्थी व मंजूर विमा रक्कम
जिल्हा लाभार्थी शेतकरी मंजूर विमा रक्कम
औरंगाबाद 2 लाख 67 हजार 157 कोटी 95 लाख
जालना 5 लाख 84 हजार 178 कोटी 43 लाख
बीड 7 लाख 04 हजार 263 कोटी 37 लाख
लातूर 5 लाख 79 हजार 190 कोटी 86 लाख
उस्मानाबाद 6 लाख 08 हजार 233 कोटी 26 लाख
नांदेड 6 लाख 03 हजार 453 कोटी 88 लाख
परभणी 3 लाख 32 हजार 106 कोटी 11 लाख
|