जायकवाडी, ता. 2 (जि.औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने रविवारी (ता. एक) कालवा बंद करण्यात आला. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी 900 क्युसेकने पाणी सुरू असून सध्या धरणाच्या पाण्याची टक्केवारी 85.80 टक्के असून लाभक्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बंद आहे. धरण परिसरात झालेल्या पावसाचे पाणी थोडेफार धरणात येत असल्याची माहिती जायकवाडी धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आली.
जायकवाडी धरणात 92 टक्क्यांच्या वर पाणी आल्याने जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे डावा कालवा बंद करण्यात आला असून उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाणी सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून औरंगाबाद, जालना व परभणी या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या कालव्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. डाव्या कालव्यातून 2000 क्युसेकने पाणी सुरू होते ते रविवार बंद करण्यात आले आहे. डावा कालवा 0 ते 122 किलोमीटरपर्यंत आहे.
पैठण डावा कालवा खरीप प्रथम आवर्तनाचा संकल्पित कालावधी पावसामुळे वेळेअगोदर संपला. त्यामुळे कालवा बंद करण्यात आला आहे. पिकांच्या गरजेनुसार लवकरच दुसरी खरीप पाणीपाळी देण्यात येणार आहे.
- राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, पैठण.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.