किल्लारी/लामजना - किल्लारी परिसराला मंगळवारी दुपारी भूकंपाच्या सौम्य धक्का बसला. सास्तूर येथील भूकंपमापन केंद्रात या धक्क्याची तीन रिश्टर स्केल एवढी नोंद झाली. यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. धक्का जरी सौम्य असला, तरी त्याने नागरिकांना धास्तावून सोडले.
किल्लारी व परिसरात झालेल्या भूकंपाला 24 वर्षे उलटली आहे. तेव्हापासून येथे भूकंपाचे धक्के वारंवार बसत आहेत. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला आणि 1993च्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. या धक्क्याने किल्लारी, लामजना, मंगरूळ, मोगरगा, खरोसा, चिंचोली (जोगन), कारला, कुमठा, येळवट, पारधेवाडी, गुबळ, नांदुर्गा, तळणी, कारला, सिरसळ आदी गावांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूरलाही धक्का जाणवला. अचानक जमिनीतून आवाज झाल्याने पत्र्यांचा आवाज व मांडणीत ठेवलेली भांडी खाली पडू लागल्याने लोक घराबाहेर पळत सुटले. जमिनीतून स्फोटासारखा येणाऱ्या आवाजाने नागरिक घाबरून गेले.
आगाऊ सूचना देणाऱ्या यंत्रणेची गरज
किल्लारी, लामजना भागाला सर्वांत जास्त भूकंपाची झळ बसलेली आहे. अधूनमधून भूकंपाचे धक्के सहन करावे लागत असल्याने या परिसराच्या भूगर्भाची चाचणी करून भूकंप येण्यापूर्वी सूचना देणाऱ्या यंत्रणेची गरज येथे आहे, अशी अपेक्षा या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
|