सोंगणी अंतिम टप्प्यात, मजुरांची टंचाई

सोंगणी अंतिम टप्प्यात, मजुरांची टंचाई

टाकळी राजेराय (जि.औरंगाबाद) ः गेल्या पंधरवाड्यात झालेल्या परतीच्या पावसाने लांबलेल्या खरीप पिकांची सोंगणी व काढणीला आता वेग आला आहे. सर्वच कामे एकत्र आल्यामुळे मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यातच परत येत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. तग धरून असलेल्या पिकांना पोळा सणानंतर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे हातात आलेले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मका पिकाला कोंब फुटले आहेत. तर कापूस पिकांच्या कैऱ्या सडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या ढगांच्या गर्दीमुळे शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा पावसाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वेगाने कामाला लागले असून दिवस निघाल्यापासून आपल्या कुटुंबीयांसह शेतात जाऊन मका सोंगणी करीत आहेत. तर अनेक शेतकरी मजुरांच्या शोधात दिसत असले, तरी सर्वांची कामे एकत्र आल्यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या लहान मुलांना घेत सोंगणी करताना दिसत आहेत. आता सोंगणी शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानंतर रब्बीचा पेरा उशिरा का होईना; पण मोठ्या प्रमाणात होणार आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com