‘जमीन विक्री होईना अन्‌ पोरींचं लगीनही होईना’

‘जमीन विक्री होईना अन्‌ पोरींचं लगीनही होईना’

औरंगाबाद -  ‘दुष्काळामुळं गावात हाताला काम नई. त्यामुळं चार टेम्पो भरून गावातील महिला एगळ्या-एगळ्या कंपन्यात जातात. दोन टेंपो भेंडाळा फाट्यावरील कंपनीत जातात. एका टेम्पोत पन्नास, काहीत साठ, तर काहीत चाळीस महिला जाता. ते पण रोज सकाळचे सात ते संध्याकाळचे सात. पहिलं आमच्या इथ सोंगायला दीडशे अन्‌ दोनशे रुपये रोज होता. दहाला बाया रानात यायच्या अन्‌ पाचलाच सुटायच्या. आता दीडशे-दोनशे रुपयांत बारा तास काम करावं लागतं...असं पंचाहत्तरी पार केलेले कनकोरी शिवारातील (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) दत्तात्रय गवळी सांगत होते.

गावातील दुष्काळाची स्थिती ते कथन करीत होते. ‘काय करावं, समजत नई. पुरुष घरी अन्‌ बाया कामाला जाऊ राहिल्या. गावात काम नई. असलं तरी जनावरं संभाळावं लागतं. एक दुख नई ना? दुष्काळामुळं मुलींच्या लग्नांचा वांदा. लग्नासाठी काहींनी जमीन विकण्याची तयारी केलीय; पण जमीनबी कोणी घ्यायलाच तयार नई, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

गंगापूर तालुक्‍याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. शिवना नदी काठावरील गावेही टॅंकरवर जगत आहेत.  ग्रामस्थांबरोबर जनावरेही टॅंकरवर जगवावी लागत आहेत. याचविषयी गवळी सांगत होते. ‘बरं आम्ही जाऊ कुठं बी. झाडू मारू. पाचशे नई, तर दोनशे रुपये रोज कमवू. पण, जनावारांना कोणं वळायचं? यांना टाकायला तरी पाहिजेना काही? त्याहीपेक्षा घरातली बाई तिकडं दोनशे रुपये कमविते. पोरंग तीनशे रुपये कमवून आणतं. आमी म्हातारं इकडे ढोर चारीतं. तीनशे-दोनशात बाजार, धान्य भागवायचं. पाहुणा-रावळा सगळ यातच. हे सांगतं कोणाला? आमचा वाली कोण हाय? गावात पोरींच्या लग्नासाठी चार जमीन विक्रीसाठी आहेत. पूर्वी दहा लाखाले विक्री झालेली जमीन आज पाच लाखाला बी कोनी घेईना. दुष्काळामुळं जमीन विक्री होईना, अन्‌ पोरींचं लग्नही होईना. पोरांना तर मुलीच भेटत नई. आमची वागणूक चांगली आहे. तरी, बिगरव्यसनी आहे. पुढील पिढी दारूच्या आहारी गेली आहे. त्यानले कामच करायचं नई. जर मुलांना जनावरं बघ म्हणलं तर ते जनवारं इकून टाक म्हणत्यात. पुढची पिढी घरी जेवणपेक्षा बाहेर ढाब्याव जेवायला जातात. आपले आचारण चांगले नई, मग कसा पाऊस पडंल?, असेही गवळी सांगत होते.

पूर्वी ओंजळीने बया भीक वाढयच्या. उली-उली घरं राहीची. गड्डे खंदून धान्य पुरलं जायाचं. आज काय कंडिशन आहे? तुम्ही भिकारीहून भिकारी होऊन बसले. कारण तुमची नियती ठिकाणावर राहिली नाही. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगून गवळी यांनी पूर्वीच्या आणि आताच्या स्थितीची तुलनाही झटक्‍यात केली.

नदीतील विहीरही आटली
शिवना पात्र परिसरात जमीन असलेल्या शेख मुक्‍तार शेख करीम यांनाही यंदाचा दुष्काळाचा फटका बसला आहे. ३० एकर जमिनीतून मोठे उत्पन्न ते घ्यायचे. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यांनी शिवना नदीच्या पात्रात मोठी विहीर खोदली. तिही आटलेली असून मिळणारे पाणी जनावरांपुरतेच पुरते, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, यंदा जायकवाडीचे बॅक वॉटर न आल्याने व शिवना नदीपात्र कोरडे पडल्यामुळे पाणी नाही. नदीकाठावरील दोन विहिरींत सध्या पाण्याचा थेंब नाही. तीन एकरांत ज्वारी पेरली होती. केवळ चार गोण्याच झाल्या. आता गहू विकत घ्यावा लागणार आहेत. आमच्याकडे १२ बैले, ८ म्हशी, आठ शेळ्या, चार वासरे आहेत. त्यांच्यासाठीच पाणी राखीव ठेवावे लागत असल्याचे शेख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com