परिवर्तन न झाल्यास ही शेवटची निवडणूक! - अशोक चव्हाण

लातूर - जनसंघर्ष यात्रेचे उद्‌घाटन मशाल पेटवून करताना अशोक चव्हाण. या प्रसंगी उपस्थित शिवराज पाटील चाकूरकर, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मधुकरराव चव्हाण, अमित देशमुख आदी.
लातूर - जनसंघर्ष यात्रेचे उद्‌घाटन मशाल पेटवून करताना अशोक चव्हाण. या प्रसंगी उपस्थित शिवराज पाटील चाकूरकर, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मधुकरराव चव्हाण, अमित देशमुख आदी.

उदगीर - ‘देशात व राज्यात जे घडतेय ते योग्य नाही. त्यासाठी परिवर्तन केले पाहिजे. आरएसएस, भाजपवाले मतदानाचा अधिकार काढून घेण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन न झाल्यास ही देशातील शेवटची निवडणूक असेल’, असे भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २५) येथे काँग्रेसच्या तिसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलताना केले.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूशीला टोकस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, प्रवक्ते राजू गायकवाड, शैलेश पाटील चाकूरकर, अशोक पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख, ॲड. व्यंकट बेद्रे, राजेश्वर निटुरे, सिद्घेश्वर पाटील यांची उपस्थिती होती. 

श्री. चव्हाण म्हणाले, की खोटी आश्‍वासने देणाऱ्या मोदी सरकारने जीएसटी, नोटाबंदी करून देशातील जनतेचे नुकसान केले. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर, समाजवादी, शेकाप, राष्ट्रवादी या समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. राफेल प्रकरणाची फाइल डायरेक्‍टरने काढताच भ्रष्टाचाराचे पितळ उघड पडेल म्हणून त्यांना रजेवर पाठविल्याचा आरोपही त्यांनी केला. 

‘लोकशाही राज्य निर्माण केले’
शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, की आधीच्या सरकारने साठ वर्षांत देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वांना एकत्रित करून लोकशाही राज्य निर्माण केले. अस्पृश्‍य प्रथा बंद करून सर्वधर्म समभावाची जोपासना केली. प्रगतीसाठी कसेल त्याला जमिनी दिल्या. जगात प्रथमच अन्नसुरक्षा कायदा भारतात अस्तित्वात आणला.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, अमित देशमुख यांची भाषणे झाली. ॲड. पद्माकर उगिले यांनी सूत्रसंचालन केले. उषा कांबळे यांनी अभार मानले.

सरकारविरोधातील असंतोष संघटित करण्याचे काम
लातूर : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात बुधवारी (ता. २४) रात्री येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर सभा घेण्यात आली. यामध्ये अशोक चव्हाण म्हणाले, की सरकारच्या विरोधात जनतेत असलेला असंतोष जागृत करण्यासाठी काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली आहे. जनतेतील असंतोष संघटित करण्याचे काम यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे. हे सरकार घालवून जनतेचे सरकार आणायचे आहे, असा संकल्प यात्रेच्या निमित्ताने करण्याचे आवाहन श्री. थोरात यांनी केले. अनेक आंदोलने करूनही सरकारने चुकीची धोरणे बदलली नाही. यामुळे आता सरकार सुधारेल, याचा भरोसा वाटत नसल्याची टीका दिलीपराव देशमुख यांनी केली. यात्रेनिमित्त दुचाकी फेरी काढण्यात आली. सुधन्वा पत्की यांनी सूत्रसंचालन केले.

‘भाजपला सत्तेचा आलेला माज उतरवा’
निलंगा : चुकीची माणसे निवडून दिल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पश्‍चात्ताप करण्याची वेळ आली आले. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविण्यात आली; पण खरेच अच्छे दिन आले का? राज्यासह देशाचे वाटोळे करण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २४) निलंग्यातील सभेत केला. यावेळी डॉ. निलंगेकर म्हणाले, ‘हे सरकार केवळ थापा मारणारे असून लोकहिताचा कोणता निर्णय घेतला? मतदारसंघातील सर्व विकासकामे माझ्यामुळेच झाली आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत असून दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा.’ अशोकराव पाटील निलंगेकर यांनी प्रास्ताविक, प्रवीण गिरी यांनी सूत्रसंचालन, तर विजयकुमार पाटील यांनी आभार मानले. 

घातपात की अपघात?
शिवस्मारकावर बोलताना चव्हाण म्हणाले, की निवडणुका आल्या की त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. आमदार मेटेंनी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतरच घातपात करण्याचा प्रयत्न का झाला, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com