Coronavirus: उदगीरात जनता कर्फ्यूचा उडाला फज्जा; दिवसेंदिवस रुग्णसंख्या वााढतेय

corona curfew
corona curfew

उदगीर (लातूर): लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी (ता.२७) व रविवारी (ता.२८) या दोन दिवसाचा जनता कर्फ्यु जिल्ह्यात सुरू झाला आहे. मात्र शहरातील फळ, भाजीविक्रेते, ऑटोरिक्षा चालक व काही व्यवसायिकांनी आपले रुटीन व्यवसाय सुरू ठेवून या जनता कर्फ्युचा फज्जा उडविला आहे.

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर शहर व परिसरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हाभरातील एकंदर परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू घोषित करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. मागील संसर्गजन्य काळामध्ये अनेक वेळा शासनाच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देऊन बंद पाळला होता. त्याचीच पुनरावृत्ती व्हावी असे प्रशासनाला अभिप्रेत असताना उदगीरमध्ये मात्र शनिवारी काही ठराविक व्यावसायिकांनी या जनता कर्फ्यूला खो घालण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसून येत आहे.

उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यानी शहरातील नागरिकांना अनेक वेळा जनता कर्फ्युसाठी जनजागृती अभियान राबवले होते. सर्व नागरिकांना कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दोन दिवस घराबाहेर पडू नये गर्दी टाळावी, मास्क परिधान करावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये जनता कर्फ्युमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

या प्रशासनाच्या सर्व आव्हानाला बाजूला ठेवून शहरातील नांदेड बिदर या मुख्य रस्त्यासह मोंढा रोड, देगलूर रोड, बस स्थानक परिसर, मुक्कावार चौक, पत्तीवार चौक, उद्योग भवन परिसर येथे अनेक व्यावसायिकांनी आपले रुटीन व्यवहार सुरू ठेवले आहेत. शहरातील ऑटो रिक्षा वाले, भाजीविक्रेते, फळविक्रेते यांनी रस्त्यावर तोबा गर्दी करून आपले हातगाडे रस्त्यावर उभे केले आहेत. शिवाय नागरिकांचीही रस्त्यावर मोठी वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूचा फज्जा उडाल्याची स्थिती दिसून येत आहे.

प्रशासनाचा अंकुश नसल्याने बिंधास्त....
या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेने स्वतः होऊन जनता कर्फ्यूचे पालन करावे, त्यात प्रशासनाचा कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही अशी भूमिका जाहीर केल्याने व्यवसायिक, हातगाडीवाले व ऑटो वाले बिनधास्तपणे आपले व्यवसाय सुरू ठेवून जनता कर्फ्युचा फज्जा उडवत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाचा अंकुश असणे गरजेचे होते असे नागरिकांचे मत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com