लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा एप्रिल फुल, मॉर्निंग वॉक करणारे सहा जण ताब्यात

Latur News
Latur News

लातूर : संचारबंदीच्या काळात मार्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांना जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी बुधवारी (ता. एक) सकाळी चांगलाच एप्रिल फुल केला. नमस्कार घालून स्वागत करणाऱ्या सहा जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. यात माजी समाजकल्याण सभापती बालाजी कांबळे यांच्यासह पत्रकार व एका महसूल मंडळ अधिकाऱ्याचा समावेश आहे. या कारवाईमुळे टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) काळात तंदूरुस्तीसाठी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे.

मात्र, अनेकजण ही बाब गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. घराबाहेर न येण्याचे आवाहन करूनही लोक सकाळपासूनच रस्त्यावर बिनधास्त फिरत आहेत. पोलिसांनी कारवाई करूनही लोकांचा वावर कमी झालेला नाही. त्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी श्रीकांत पाच क्रमांक चौकातून रिंग रोडने जात होते. या वेळी त्यांना अनेकजण मॉर्निंग वॉक करताना दिसले. त्यांनी गाडीतून उतरत फिरणाऱ्यांना विचारणा करण्यापूर्वीच त्यातील काहींनी `नमस्ते साहेब` म्हणत त्यांचे स्वागत केले.

सर्वांनाच जिल्हाधिकारी चांगला प्रतिसाद देतील असे वाटले. तंदुरुस्तीसाठी कायम आग्रही असणारे श्रीकांत कौतुकच करतील, असेही त्यांना वाटले. मात्र, श्रीकांत यांनी त्यांना एप्रिल फुल करत पोलिसांच्या स्वाधीन केले. यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती कांबळे, बेलकुंड (ता.औसा) येथील मंडळ अधिकारी सुरेश सोनकांबळे व एका मुक्त पत्रकाराचा समावेश होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळीच केलेल्या या कारवाईमुळे टाळेबंदीच्या काळात तंदुरुस्तीसाठी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांत खळबळ उडाली. लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. अशा लोकांनीच सरकारचे आदेश पायदळी तुडवल्यास सामान्य लोकांनी काय धडा घ्यायचा. कायद्यासमोर सर्व समान आहेत, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी कारवाईच्या निमित्ताने स्पष्ट केले.         

मोफत भाजीसाठीची रांग येऊ शकते अंगलट
 कोरोनाही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यामुळे यात मदतीला धावून येणारे पुढे येत आहेत; पण काही उत्साही कार्यकर्ते मात्र आपण सामाजिक अंतराचे उल्लंघन तर करीत नाहीत ना याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. असाच एक प्रकार मंगळवारी (ता. ३१) दुपारी येथील साळे गल्लीत घडला. एका कार्यकर्त्याने मोफत भाजी देण्याचा उपक्रम राबविला. याकरिता महिलांची मोठी रांग लागली गेली. गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी पोलिसांच्या मदतीने ही गर्दी तर हटवलीच; पण संबंधित कार्यकर्त्याला समजही दिली, अशा गर्दीत एखादा कोरोनाबाधित रुग्ण आला तर ही गर्दी स्वतःच्या अंगलट येऊ शकते, हे लक्षात घेण्याची गरज आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांची टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम झाला आहे. हातावरचे पोट असलेल्यांची यात मोठी गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन मदतीचे हातही पुढे येत आहेत. काही जण घरोघरी जाऊन अशा लोकांना मदत करताना दिसत आहेत. काही जण त्यांच्या जेवणाची सोय करीत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत; पण काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह अंगलट येण्याची शक्यता आहे. मंगळवारी असाच एक प्रकार येथील साळे गल्लीत घडला.

एका कार्यकर्त्याने मोफत भाजी वाटण्यास सुरवात केली. पाहता-पाहता ही माहिती साळे गल्ली, म्हैसूर कॉलनी, ताजोद्दीनबाबानगर भागात पसरली. त्यामुळे घराघरांतील महिला ही भाजी घेण्यासाठी रस्त्यावर आल्या. त्यांच्या रांगाही लागल्या. गर्दी वाढली. याची माहिती मिळताच या भागाचे महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी किसवे यांनी पोलिसांच्या मदतीने ही गर्दी हटविली. त्यानंतर या संबंधित व्यक्तीला समजही देण्यात आली. सध्या शहरात अनेक ठिकाणी असेच प्रकार सुरू आहेत. अशी गर्दी सध्याच्या साथीच्या रोगाच्या काळात अंगलट येऊ शकते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com