जगावं कसं? हा घोर झोपूबी देईना

शेतात पेरलेल्या गहू आणि हरभऱ्याची झालेली अवस्था.
शेतात पेरलेल्या गहू आणि हरभऱ्याची झालेली अवस्था.

औसा(जि. लातूर ) ः "औंदाचं वरीस लई बेकार आलंय बघा आमच्या नशिबाला... खरिपाची पेरणी पाऊस नसल्यानं करता आली नाही, हातात अन्‌ खिशात काईच नाही म्हणून रब्बीचंबी मातीत कालविलं... त्यो तरी आधार दियील असं वाटत होतं; पण पावसानं सगळा सत्यानाश केला. रानाला पाणी लागून पिकं पिवळीचुटुक पडली अन्‌ मरू लागली; पण हातात काईच नाही. आता जगावं कसं? हा घोर झोपूबी देत नाही... चवाळ लागलेल्या रानातून निघणाऱ्या पाण्याकडं बघितलं, की आमच्याबी डोळ्यांतून पाणी वघळतंय...

नागरसोगा (ता. औसा) येथील शेतकरी अजित साळुंके, शिवाजी गिरी, संजय मुरडे, अभिलाष फावडे, महेश सूर्यवंशी यांनी आपली व्यथा डबडबलेल्या डोळ्यांनी "सकाळ'जवळ बोलून दाखविली. 
जगण्याची आशा असलेल्या रानातल्या पिकांचं डोळ्यांदेखत वाटोळं झालेलं पाहताना काळजाळा पीळ यासाठी पडतो, की उद्या जगावं कसं? कशाच्या आधारावर पोरांची शाळा, कॉलेजं करायची आन्‌ पोरींचे हात पिवळे, असा सवाल ते करीत होते


औसा तालुक्‍यातील शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करतोय. ज्यांनी हिंमत हारली त्यांनी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबिला. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या याच तालुक्‍यात झाल्या आहेत. आधीच खरिपाच्या 20 ते 30 टक्केच पेरण्या तालुक्‍यात झाल्या. बाकी 70 टक्के शेतं काळीच राहिली. खरीप गेलं तरी रब्बी चांगली येईल, अशी आशा होती; मात्र परतीच्या पावसाने पेरलेली रब्बी घालविली.

दोन एकरांवर हरभरा, सूर्यफुल आणि ज्वारी तर दोन एकरांवर गहू पेरलेल्या शिवाजी गिरी या शेतकऱ्याने उभ्या पिकात आता कुळव घातला आहे. हे कुळवीत असताना माझं काळीज कुळविल्यागत वेदना होत असल्याचे ते म्हणतात. होतं नव्हतं ते गोळा करून पेरणी केली होती. आता तेबी कुळवून टाकावं लागत आहे. आता दुबार पेरणीसाठी खिशात खडकूही नाही. त्यामुळे उद्याचं कसं? हा प्रश्न सतावत असल्याचे हे शेतकरी महणाले. 
कांदा लावून संसाराला हातभार लावावा म्हणून अजित साळुंके यांनी दोन एकरांवर कांदा लागवड केली.

कांदा लावल्यापासून पावसाने झड लावली, कितीही फवारण्या केल्या तरी कांदा उबदरी आला नाही. कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत; मात्र या शेतकऱ्यांच्या कांद्याला पावसाने घालविले आहे. खुर्चीसाठी सरकार भांडत आहे; मात्र आमच्या जगण्याचा विचार कुणीबी करीत नसल्याची खंत या शेतकऱ्याला आहे. कुणब्याला जगवायचं असेल तर त्याला संकटाच्या काळात मदतीचा हात द्या, नाही तर तो जगणार नसल्याचे शेतकरी अभिलाष फावडे म्हणाले.

चवाळ लागलेल्या रानात आता दुबार पेरणीही करता येणार नसल्याने आम्ही जगावं कसं? असा प्रश्न संजय मुरडे यांनी केला. सात बॅग मका केलेला उच्चशिक्षित तरुण शेतकरी महेश सूर्यवंशी यांच्याकडे तर आता रान दुरुस्त करायलाही पैसा नाही. एकूणच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com