लातूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत कलम 202 नुसार फौजदारी प्रक्रिया संहिताअन्वये तपास करून ता. तीन जुलैच्या आत अहवाल सादर करावा, असे आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी दिले आहेत.
रावसाहेब दानवे यांनी जालना येथे "एक लाख क्विंटल तूर खरेदी केली तरी रडतात...' असे शेतकऱ्यांना उद्देशून वक्तव्य केले होते. ही एक प्रकारची शिवी आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मानसिक दुखापत व अवहेलना करून जाणीवपूर्वक क्षती पोहचवली होती. रावसाहेब दानवे यांनी जाणीवपूर्वक वक्तव्य केल्याने शेतकऱ्यांचा अपमान होऊन राज्यातील सामाजिक शांततेचा भंग झाला आहे. म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सतीश देशमुख यांनी भारतीय दंड संहितेचे कलम 323, 504, 506 अन्वये येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
या फिर्यादीची दखल घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी घडलेल्या घटनेबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याने कलम 202 फौजदारी प्रक्रिया संहिताअन्वये तपास करून ता. तीन जुलैपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ऍड. उदय गवारे व ऍड. व्यंकट नाईकवाडे हे न्यायालयासमोर बाजू मांडत आहेत.
|