लातूर - 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 52 महिने, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 34 महिने पूर्ण झाले आहेत. हत्येच्या कटाचे सूत्रधार म्हणून आरोपपत्र दाखल झाल्याने सनातन व हिंदू जनजागरण समितीचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे तुरुंगात आहे; पण फरारी आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. शासनाने विशेष कृती दल स्थापन करून (स्पेशल टास्क फोर्स) या प्रकरणांचा तपास करावा,'' अशी मागणी डॉ. हमिद दाभोलकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हत्या प्रकरणांतील फरारी संशयित मारेकरी सारंग अकोलकर व विनय पवार यांना पकडण्यात शासन दिरंगाई करीत आहे. पानसरे, ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांमध्ये एकच पिस्तूल वापरल्याचेही पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणांच्या तपासासाठी शासनाने आता "स्पेशल टास्क फोर्स' नेमण्याची गरज आहे. तपास व्यवस्थित नाही झाला, तर अटकेतील आरोपी जामिनावर सुटण्याची भीती आहे, असे हमीद दाभोलकर म्हणाले.
|