लातूर - "राज्यातील सरकारवर टांगती तलवार आहे, असे सत्तेतील काही लोक आणि विरोधक म्हणत आहेत. मात्र, मी टांगत्या तलवारीची चिंता करीत नाही. माझ्याकडे भरपूर अदृश्य ढाली असल्याने मी निश्चिंत आहे,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
फडणवीस हे गुरुवारी लातूर दौऱ्यावर होते. हलगरा (ता. निलंगा) येथे त्यांनी श्रमदान केले. शिवार संवाद सभेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी काही पत्रकारांशी ते अनौपचारिक गप्पा मारत होते. तुमच्यावर टांगती तलवार आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर, "मला वाचविण्यासाठी भरपूर ढाली आहेत, त्या अदृश्य आहेत. त्यांना जरी वाटत असले, तरी माझ्यावर टांगती तलवार नाही. मी बिनधास्त, निश्चिंत आहे. ही सर्व ईश्वराची कृपा आहे,' असे ते म्हणताच उपस्थित पत्रकारांत हशा पिकला. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी मध्यावधी निवडणुकीला तयार राहावे असे आवाहनच कार्यकर्त्यांना केले होते. त्यांचे हे भाकितदेखील फडणवीस यांच्यावर टांगती तलवार आहे, हेच सुचविणारे होते.
|