लातूर-टेंभुर्णी रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव दिल्लीत पडून

road
road

लातूर : राज्यातील अनेक छोट्यामोठ्या रस्त्यांचे रुंदीकरण होऊन त्यावरून जोरदार वाहतूक सुरू झाली तरी लातूर ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे नशीब कधी उजळणार, असा प्रश्न सर्वांना पडतो. हा रस्ता राज्य महामार्गावरून राष्ट्रीय महामार्ग झाला. रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याच्या व त्याच्या निविदाही निघाल्याच्या चर्चा घडून आल्या. मात्र, पुढेच काही झाले नाही.

या रस्त्याची सध्याची स्थिती शोधली असता रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पुणे कार्यालयाने दिल्लीच्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाला पाठवला असून, तो सहा महिन्यांपासून मंत्रालयातच पडून असल्याची माहिती मिळाली आहे. 
यामुळे लातूरची "लाइफलाइन' असलेल्या या रस्त्याचा चेंडू केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कोर्टात असून, हा रस्ता चौपदरी होणार नसून तो तीनपदरीएवढाच होणार आहे.

असा असेल रस्ता 

हा रस्ता दहा मीटरचा होणार असून रस्त्याच्या बाजूने प्रत्येकी दीड मीटरच्या साईडपट्ट्या होणार असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे पुणे येथील उपकार्यकारी अभियंता संदीप पाटील यांनी दिली. पुणे व मुंबई तसेच अन्य मोठ्या शहरांना जाण्यासाठी रस्ता महत्त्वाचा आहे. दोन राष्ट्रीय महामार्गांनाही हा रस्ता संलग्न होत असल्याने लिंक हायवे म्हणून त्याची ओळख पुढे येत आहे.

या रस्त्यावरून मोठी वाहतूक असूनही त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्याचे कारण नेहमीच गुलदस्त्यात असते. मध्यंतरी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला. प्राधिकरणालाही रस्ता रुंदीकरणासाठी यश आले नाही. त्यानंतर प्राधिकरणाने पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. सध्या तो बांधकाम विभागाकडेच असून, या रस्त्याचे पुन्हा राज्यमार्गात रूपांतर करून त्याचे रुंदीकरण व देखभाल दुरुस्ती करण्याच्या हालचाली विभागाकडून सुरू आहेत. 

रस्ता वार्षिक आराखड्यात यावा 


रस्त्याच्या कामाची गेल्या काही वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे. रस्त्याचे चौपदीकरण करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. मात्र, सध्यातरी हा रस्ता दोनपदरी व दहा मीटर रुंद होणार आहे. सध्या रस्त्याची रुंदी काही ठिकाणी पाच, तर काही ठिकाणी सात मीटर आहे. रस्ते विकास महामंडळाने प्रस्ताव दिल्लीला पाठवला असून, त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून सध्या वार्षिक आराखडा तयार करण्यात येत असून, आराखड्यात रस्त्याचा प्राधान्याने समावेश होऊन कामाला लवकरच मुहूर्त लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यासाठी लोकप्रतिनिधींनी मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांचा प्रभावी पाठपुरावा  
लातूर-टेंभुर्णी रस्ता सिमेंटचा व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. यासाठी ते सातत्याने पत्रव्यवहार करत असून लवकरच रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून कामाच्या निविदा निघण्याची आशा त्यांना आहे. दरम्यान, या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण दिल्लीत ठाण मांडणार असून श्री. गडकरी यांच्याकडून काम मंजूर करून घेणार असल्याचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. सध्या रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अरुंद रस्त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून रस्त्याला लागलेला शाप कधी निघणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com