का झालं. कसं झालं...  काही कळेचना..!

का झालं. कसं झालं...  काही कळेचना..!

लातूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयासाठी प्रभावी नियोजन करून टाईट फिल्डींग लावली असताना जिल्ह्यात अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. निवडणूक निकालानंतर या उमेदवारांनी पराभवाच्या कारणांचा ‘शोध’ घेतला असून प्रचारात दगा फटका करणाऱ्या कार्यकर्त्यांची खास ‘परेड’ घेऊन विचारणा सुरू केली आहे. यानंतरही उमेदवारांना ‘का झालं अन्‌ कसं झालं‘, याचा बोध होत नसल्याची स्थिती आहे.

प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी केली. यात निवडणुकीपूर्वी असलेल्या राजकीय समीकरणांत निवडणुकीनंतर मोठे बदल झाले. 

मदत करण्याचे आश्वासन दिलेल्या नेत्यांनी प्रचारासाठी वेळ दिला नाही. आघाडी व पक्षांतर्गत राजकारणात अनेकांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही. काहींनी शब्द देताना स्वतःचे वजन ‘इन कॅश’ केले. काही समाजांचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनीही विजयासाठी पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनीच सांगितल्यानुसार ‘नोटाबंदी’ची अडचण असतानाही उमेदवारांनी ‘हात’ ढिला सोडला. नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. वाहनांच्या ताफांचा धुरळा उडून विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. 

सर्वकाही आलबेल असताना निकाल मात्र विरोधात गेला. यात बोटावर मोजता येईल, एवढ्या उमेदवारांना पराभव माहीत झाला असावा. तरीही त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सर्वेक्षणापासून प्रचारापर्यंत प्रभावी नियोजन करून व पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अनेक उमेदवारांना पराभव पचनी पडत नसल्याची स्थिती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत विजय आपलाच असल्याचा दावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निकालानंतर ‘हात’वर केले. यातूनच काही भागांत उमेदवारांचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. यामुळेच त्यांनी पराभवाच्या कारणांचा शोध सुरू केला असून ‘ढिला’ केलेला ‘हात’ मतदारांपर्यंत पोचला की नाही, याचीही खातरजमा सुरू केली आहे. यामुळे मतदारापर्यंत ‘सर्वकाही’ पोचविण्याचे काम पार पाडणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनीही जीव ओतून कसा प्रचार केला, याचे पुरावे देण्यास सुरवात केली आहे. त्यापुढे जाऊन उमेदवारांनी जवळच्या व्यक्तींकडून पराभवांच्या कारणांचा शोध सुरू केला, तरी त्यांना नेमका अंदाज येत नसल्याची स्थिती आहे. 

निवडणूकपूर्व सर्वेक्षणाची माती
विद्यमान पदाधिकाऱ्यांसह मागील काही निवडणुकांत पराभवांचा अनुभव असलेल्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी मतदारसंघात आपल्या यंत्रणेकडून खास सर्वेक्षण केले. काही नेत्यांनी सर्वेक्षण करून देणाऱ्या खासगी संस्था व कंपन्यांचाही आधार घेतला. यातून पुढे आलेल्या माहितीवरून उमेदवारीची तयारी केली. त्यानुसार राजकीय डावपेच आखले गेले व तयारी केली. प्रत्यक्षात निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतर सर्वेक्षणातील अंदाज धुळीस मिळाले. निकालानंतर अनेक मतदारसंघांत या सर्वेक्षणाची माती झाल्याची चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com