भावी वकिलांना सूट नाहीच, विधी विभागाच्या सर्व वर्षाच्या परीक्षा होणार!

pariksha.jpg
pariksha.jpg

लातूर : कोरोनामुळे विविध पदवी अभ्यासक्रमाच्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. विधी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षाही याच पद्धतीने घेण्यात आल्यामुळे अन्य पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे विधीच्याही अंतिम वर्ष सोडून अन्य वर्षांच्या परीक्षा न होता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणाआधारे उत्तीर्ण केले जाण्याची आशा होती.

मात्र, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे पत्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार विद्यापीठाने भावी वकिलांना ही सवलत नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे विधी अभ्यासक्रमाच्या उर्वरित सर्व वर्षाच्या परीक्षा होण्याचे निश्चित झाले असून, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (एसआरटी) परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. 

कोरोनामुळे यावर्षी पदवीच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यावर मर्यादा आला. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पदवी देण्यावरही काथ्याकूट झाला. वादविवादातच अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या. यामुळे अंतिम वर्ष सोडून उर्वरित वर्षाच्या परीक्षा न घेता अंतर्गत गुणांवरून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य अभ्यासक्रमाप्रमाणे विधी अभ्यासक्रमासाठीही हा निर्णय लागू असल्याचे विद्यार्थ्यांना वाटत होते. यामुळे विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षा न देताही उत्तीर्ण झाल्याच्या आविर्भावात होते.

मात्र, विद्यापीठाने अचानक अंतिम वर्ष सोडून अन्य वर्षाच्या परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नऊ जूनच्या पत्रानुसार व राज्य सरकारच्या सूचनेनुसार अंतिम वर्ष सोडून अन्य वर्षाच्या परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात आला तरी या परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पुढील वर्षात प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची उन्हाळी २०२० परीक्षा आता हिवाळ्यात येत्या २० नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान घेण्याचे नियोजन केले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील ठरावानुसार परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. 

दोन तासाच्या परीक्षेत तीन प्रश्नांचे बंधन 
एलएलबी प्रथम व द्वितीय वर्ष, बीएसएल प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष तर एलएलएमच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करताना विद्यापीठाने ही परीक्षा प्रचलित म्हणजे लेखी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासाचा केला असून, विद्यार्थ्यांनी एकूण प्रश्नांपैकी तीन प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना तीन प्रश्नांना मिळणारे गुण त्या त्या विषयाच्या एकूण गुणांपैकी रुपांत्तरित करण्यात येऊन निकाल जाहीर होणार आहे. परीक्षेत अशी सवलत देण्यात आली असली तरी आता अंतिम वर्षाचे विद्यार्थीच भाग्यवान ठरल्याची भावना अन्य वर्षाच्या विद्यार्थ्यांत आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com