कोल्हापूर - 'सर्किट बेंच'साठी कोल्हापुरात सुरू असलेला वकिलांचा लढा निर्णायक टप्प्यावर आला आहे. कुणीही कितीही दबाव आणला, तरी आंदोलन मागे घ्यायचे नाही. "बेंच'साठी प्रसंगी वकिली सोडू; पण मागणी मान्य करूनच घेऊ,' असा निर्धार कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांनी शुक्रवारी केला. तहसील, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 फेब्रुवारीला मोटारसायकल रॅली अथवा मोर्चा काढण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाचे "सर्किट बेंच' कोल्हापूरमध्ये व्हावे, या मागणीसाठी गेल्या महिन्यापासून साखळी उपोषण सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांकडे दोन वेळा भेट मागितली; मात्र त्यांनी ती नाकारली. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दारात बसू. त्यातूनही तोडगा निघाला नाही, तर वकिलीची सनद जमा करू, अशा इशारा आजच्या बैठकीत देण्यात आला. "सर्किट बेंच'चे आंदोलन हे केवळ वकिलांचे आंदोलन नाही. लाखो पक्षकांराच्या हिताचे आंदोलन आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने नव्याने "कोल्हापूरसाठी सर्किट बेंच' असा ठराव करावा, अशी मागणी या वेळी झाली. ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे, एस व्ही. पाटील, राजेंद्र चव्हाण, सांगलीचे आर. आर. पाटील, सातारा बार असोसिएशनचे गजानन घाटगे, ऍड. विजयसिंह पाटील, मिरजेचे बिस्मील नांगरे आदींनी आपली भूमिका मांडली.
मुंबई मॅरेथॉनमध्ये "बेंच'साठी नारा
मुंबईत रविवारी होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सिटिझन फोरमचे संस्थापक प्रसाद जाधव सहभागी होत आहेत. कोल्हापूरच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या दहा वर्षांपासून ते रस्त्यावर उतरत आहेत. 42 किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉनमध्ये ते सहभागी होतील.
वकील म्हणतात
-आंदोलन पक्षकांराच्याही हिताचे.
- "कोल्हापूरसाठी सर्किट बेंच' असा नवा ठराव करा.
- महसूलमंत्र्यांनी लक्ष घालावे.
- प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये बसू.
- नागरिकांनीही आंदोलनात सहभागी व्हावे.
|