पाच जिल्ह्यांत तडाखा; 6 जखमी, 200 कोंबड्या दगावल्या
नांदेड, औरंगाबाद - वादळी वाऱ्यासह झालेला जोरदार पाऊस आणि गारपिटीचा रविवारी (ता. 15) मराठवाड्याला तडाखा बसला. या वादळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. माहूर आणि तुळजापूर येथे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले.
नांदेड शहराला सायंकाळी अर्धा तास पावसाने झोडपले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. हिंगोली, कळमनुरी तालुक्यात गारांचा तर, वसमत, सेनगाव तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. तुळजापूर (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील अपसिंगा येथील वादळी वाऱ्यामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अपसिंगासह बोरी, कात्री, कामठा, मोर्डा या गावांना वादळाचा फटका बसला. काही ठिकाणी घरांवर झाडे पडली, काही ठिकाणी विजेचे खांब पडले. या वादळात अपसिंगा येथील महादेव बाबूराव गाडेकर (वय 45), प्रवीण भारत सोनवणे (वय 30), ताई भाऊराव सोनवणे (वय 55), भारत सिद्राम राऊत (वय 65), जयराम शिवराम कोपे (वय 15), विलास शंकर रोघे (वय 35) सहा जण जखमी झाले.
लातूरमधील सारोळा (ता. औसा) येथे अवकाळी पावसामुळे रियाज शेख यांच्या दोनशे कोंबड्या दगावल्या. त्यांच्या अर्धा एकर आंबा बागेचेही प्रचंड नुकसान झाले. उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यात पाच बैल दगावले.
|