नागरिकांचा श्‍वास गुदमरला

औरंगाबाद - नागेश्‍वरवाडी भागात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून दुर्गंधी सुटली आहे.
औरंगाबाद - नागेश्‍वरवाडी भागात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून दुर्गंधी सुटली आहे.

औरंगाबाद - शहराच्या कचराकोंडीवर तब्बल नवव्या दिवशीदेखील तोडगा निघू शकला नसल्याने जागोजागी साचलेल्या सुमारे साडेतीन हजार टन कचऱ्याच्या ढिगातून दुर्गंधी सुटली आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून नाक बंद करून जावे लागत आहे. परिस्थिती आवाक्‍याबाहेर गेल्याचे वारंवार सांगणारे पदाधिकारी, अधिकारी ठोस निर्णय घेत नसल्याने संपूर्ण शहराचे आरोग्य बिघडण्याचा धोका वाढला आहे. 

शहराची गेल्या नऊ दिवसांपासून कचराकोंडी कायम आहे. नारेगाव (मांडकी) येथील आंदोलनकर्त्या नागरिकांची पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह महापालिका पदाधिकारी,  जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वारंवार भेट घेऊन महापालिकेला वेळ देण्याची मागणी केली; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. नागरिक माघार घेण्यास तयार नसल्याने महापालिकेने बाभूळगाव, मिटमिटा, वाळूज शिवार, चिकलठाणा येथे कचरा टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र उपयोग झाला नाही. आज तरी तोडगा निघेल, या आशेवर असलेल्या शहरवासीयांच्या नशिबी प्रत्येक दिवस निराशाच येत आहे. त्यात शहरातील मोकळ्या जागांवर जमा करण्यात आलेल्या कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. आजघडीला सुमारे साडेतीन हजार टन कचरा शहराच्या वेगवेगळ्या भागांत रस्त्यावर पडून आहे.

त्यातून मोठी दुर्गंधी सुटली असून, कचरा साचलेल्या ठिकाणाहून नागरिकांना नाक बंद करून जावे लागत आहे. येत्या काळात कचऱ्याची विल्हेवाट लागली नाही तर शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचा धोका वाढला आहे. असे असताना, महापालिका, जिल्हा प्रशासन व पदाधिकारी ठोस निर्णय घेत नसल्यामुळे कचऱ्यातून नागरिकांची सुटका होत नसल्याचे चित्र आहे. 

कठोर निर्णय घ्यावा लागणार 
कचराकोंडीवर महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, प्रशासन, पदाधिकाऱ्यांमार्फत जागेचा शोध सुरूच आहे. त्यात यश मिळत नसल्याने अद्याप कोंडी फुटलेली नाही. ही कोंडी फोडण्यासाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. 

कचरा पेटवून विल्हेवाट 
कचऱ्याचे ढीग वाढत असल्याने अनेक भागांत महापालिकेचे सफाई कर्मचारी कचरा पेटवून विल्हेवाट लावत आहेत. सुक्‍या कचऱ्याला आगी लावण्यात येत असल्याने शहराचे प्रदूषण वाढण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com