औरंगाबाद - हिंदी महासागरात होत असलेल्या पर्यावरणीय बदलांमुळे येत्या काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्रात पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
उन्हाळा सुरू होऊन महिना उलटलेला असताना ढगांचा मुक्काम हाललेला नाही. उलट येत्या दोन ते तीन दिवसांत यात वाढ होण्याची चिन्हे आहेत. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या पश्चिमेकडे एक चक्रवात निर्माण होत असून बुधवारपर्यंत (ता. 14) त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर दिशेला अरबी समुद्राच्या दिशेने बुधवारनंतर सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे अपेक्षित आहे.
सध्या ढगाळ वातावरणाने तापमानात घट झाली आहे आणि त्यामुळे पहाटेच्या वेळी थंडी कायम आहे. पश्चिमी विक्षोपीय वारे हे उत्तर गोलार्धात सध्या सक्रिय असून त्याचा परिणाम म्हणुनही पावसासह गारा पडण्याची शक्यता आहे.
गुढीपाडव्याच्या काळात हे ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानावर याचा परिणाम होत यंदाचा उन्हाळा सुसह्य राहण्याचा अंदाज एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला.
|