लातूर - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळेतील 25 टक्के जागांवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची अचानक वाढविण्यात आलेली मुदत रविवारी (ता. 11) संपली. त्यामुळे आलेल्या अर्जांची पहिली सोडत मंगळवारी (ता. 13) काढण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
गेल्या महिनाभरापासून आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची मुदत बुधवारी (ता. सात) संपली होती; पण या प्रक्रियेपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून अचानक अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीत साडेतीन हजार अर्ज आले आहेत. या अर्जांचा विचार करून एक किलोमीटर, तीन किलोमीटर आणि तीन किलोमीटरबाहेरील शाळा लॉटरीपद्धतीने दिल्या जाणार आहेत. पाल्याला कुठल्या शाळेत प्रवेश मिळाला, याचा मेसेज पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. दिलेल्या मुदतीत त्यांनी संबंधित शाळेत प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश घेतला नाही, तर संबंधित पाल्याचा अर्ज या प्रवेश प्रक्रियेतून बाद होतो.
प्रवेशासाठी पहिली लॉटरी पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी (ता. 13) दुपारी दोन ते तीन या वेळेत काढण्यात येणार आहे. या वेळी काही पालक, विद्यार्थीही उपस्थित राहणार आहेत. लॉटरी काढताच संबंधित पाल्याचे नाव शाळेला, तर शाळेचे नाव पाल्याला कळू शकेल. त्यानुसार प्रवेश घेता येईल, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.
अशी आहे आकडेवारी
शाळा : 230
जागा : 2,188
अर्जांची संख्या : 3,504
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.