जालना : जालना शहरात शुक्रवारी (ता.एक) दुपारी तसेच रात्री रिमझिम पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात पावसामुळे आधीच शेतशिवारात मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे ढग दाटून येताच ठिकठिकाणी ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी पावसाची धास्ती घेतल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यात गतमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणी आहे. असे असताना शुक्रवारी पुन्हा जालना शहरात रिमझिम पाऊस झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत कडक उन्ह होते. मात्र,दुपारनंतर आकाशामध्ये ढग दाटून आल्याने पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे दहा ते पंधरा मिनिटानंतर पावसाने उघडीप दिली.रात्री पुन्हा पाऊस सुरु झाला. वीज पुरवठाही खंडीत झाला होता. दरम्यान, घनसावंगी, परतूर, मंठा शहरातही पावसाची रिमझिम झाली.
वडीगोद्री परिसरात पाऊस
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यात नालेवाडी, टाका, रामगव्हाण आदी ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अंतरवाली सराटी भागात पाऊस झाला. त्यामुळे सुखी नाल्याला पाणी आले. सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापूस आदी पीक धोक्यात आली आहे.
आष्टीत पावसाचा तडाखा
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने तडाखा दिला. मागील महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने हाहाकार केल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या दोन दिवस उघाड दिल्याने कसेबसे पीक हाती लागेल या आशेने तयारी करताच शुक्रवारी सायंकाळी अचानक पाऊस पडला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.