औरंगाबाद - गौरी-गणपतीनिमित्त औरंगाबादसह मराठवाड्यातील बसगाड्या रद्द करून, कोकणवासीयांसाठी तब्बल सहाशे एसटी बस पाठविण्यात येणार आहेत. यामुळे मराठवाड्यातील सहाशेपेक्षा अधिक फेऱ्या रद्द होणार आहेत. बसच्या तुटवड्याने येथील प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
गौरी-गणपती उत्सव कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. कोकणातील हजारो नागरिक मुंबई, ठाणे व परिसरात राहत असल्याने या प्रवाशांना गौरी-गणपतीसाठी आपल्या गावी जाता यावे म्हणून एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद विभागाच्या तब्बल शंभर बसगाड्या; तर मराठवाड्यातून जवळपास पाचशे बसगाड्या कोकणासाठी मागविण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बसगाड्या नऊ ते 18 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर या आगारांच्या ताब्यात राहणार आहेत. यासाठी औरंगाबाद आगार क्रमांक एकमधून 17, सिडको बसस्थानकातून 18, पैठण, सिल्लोड, वैजापूर, कन्नड आगारातून प्रत्येकी 13 बसगाड्या, तर गंगापूर दहा, सोयगाव एक, अशा एकूण शंभर बस मुंबईसह कोकणाकडे रवाना होणार आहेत. याशिवाय मराठवाड्याच्या बीड, उस्मानाबाद, जालना, लातूर या विभागांतून जवळपास पाचशे बस कोकणासाठी पाठविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोकणवासीयांच्या सेवेसाठी मराठवाड्यातील बस पाठविण्यात येत असल्याने मराठवाड्याच्या जवळपास सातशे फेऱ्या रद्द होणार आहेत. कमी भारमान असलेल्या फेऱ्या रद्द करण्याचे आदेश प्रत्येक विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. यामुळे मराठवाड्यातील विविध मार्गांवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
|